Homeसंपादकीयदिन विशेषRajaram Shastri Bhagwat : समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत

Rajaram Shastri Bhagwat : समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत

Subscribe

राजारामशास्त्री भागवत हे प्रख्यात विद्वान आणि समाजसुधारक होते. भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र व्युत्पत्ती, इतिहाससंशोधन, धर्मसुधारणा, वेद-पुराणे, स्मृती वगैरेंची चिकित्सा इत्यादी ज्ञानाच्या क्षेत्रांमधील मोठे प्रज्ञावंत होते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८५१ रोजी रत्नागिरीतील कशेळी येथे झाला. राजारामशास्त्री १८६७ मध्ये मॅट्रिक झाले.

वडिलांच्या इच्छेनुसार त्यांचे ग्रँट मेडिकल कॉलेजात ३ वर्षे शिक्षण झाले. नंतर वडिलांच्या मृत्यूमुळे हे शिक्षण थांबले. एका संस्कृत पंडितांकडे अध्ययन करून ते शास्त्री झाले. नंतर रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये १८७५ साली ते शिक्षक झाले. नंतर ते सेंट झेव्हिअर कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून शेवटपर्यंत होते. १९०२ मध्ये मुंबई विद्यापीठात ‘विल्सनफायलॉलॉजिकल’लेक्चरर म्हणून त्यांची निवड झाली.

शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ साली बॉम्बे हायस्कूल व पुढे स्वावलंबनाने मराठा हायस्कूल काढले. महर्षी कर्वे, रँ. परांजपे, बॅ. जयकर वगैरे अनेक नामवंत त्यांचे विद्यार्थी होते. भागवत लोकशिक्षक होते. पाश्चात्त्य व पौर्वात्य विविध भाषांचा सखोल अभ्यास शक्य व्हावा म्हणून लॅटिन, ग्रीक, अरबी, फार्सी वगैरे भाषा ते शिकले. अस्पृश्यता निवारणाकडेही त्यांनी सक्रिय लक्ष दिले.

दीनबंधू या सत्यशोधक मुखपत्रात जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी अनेक वादळी लेख लिहिले. लोकहितवादींच्या धारदार शतपत्रांत त्यांनी भरच घातली. जोतीराव फुले व राजारामशास्त्री यांच्या काही प्रतिपादनात व कृतींत साम्य आढळते. स्त्रियांची सुधारणा व सुशिक्षण यासंबंधानेही शास्त्रीबुवांनी प्रयत्न केले. संस्कृतचे विद्वान असूनही त्यांना मराठी बोलीभाषेचा विलक्षण अभिमान होता. अशा या प्रख्यात विद्वानाचे ४ जानेवारी १९०८ रोजी निधन झाले.