डॉ. काशिनाथ घाणेकर हे मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. १९६० ते १९८० या काळातले ते मराठीतले पहिले सुपरस्टार होते. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी चिपळूण येथे झाला आणि तिथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले.१९६० ते १९८० या कालावधीत काशिनाथ हे मराठी नाट्य-चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्याकाळात ते सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होते.
‘दादी माँ’ या १९६६ मध्ये निघालेल्या हिंदी चित्रपटात त्यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेनंतर त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला.
१९६८ मध्ये निघालेल्या ‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटापासून ते मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठे अभिनेते बनले. नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशिनाथ घाणेकर यांना. ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती. त्यांच्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचे अतुलनीय योगदान आहे.
‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. ‘एकटी’,‘झेप’,‘देवमाणूस’,‘पाठलाग’,‘मधुचंद्र’,‘सुखाची सावली’,‘मानला तर देव’ या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला. अशा या महान अभिनय सम्राटाचे २ मार्च १९८६ रोजी निधन झाले.