घरसंपादकीयदिन विशेषसशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके

सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके

Subscribe

वासुदेव बळवंत फडके हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण (रायगड) गावी झाला. सातव्या वर्षांपासून त्यांच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५-६० या पाच वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा; पण त्यांनी इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली.

पहिली नोकरी जी. आय. पी. रेल्वेत केली. वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही. शेवटी १८६३ मध्ये ते लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. त्यात ते २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत म्हणजे बंडाचा बावटा उभारीपर्यंत राहिले.

- Advertisement -

मुंबईहून त्यांची बदली १८६५ मध्ये पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. १८७६-७८ या दरम्यान महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडले. त्यातच प्लेग-पटकीसारख्या साथीच्या रोगांची भर पडली. गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकर्‍यांची गुरेढोरे मेली. वासुदेवांनी पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली. या परिस्थितीला परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला.

पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इत्यादी सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यात आले. न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची- काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. अशा या महान क्रांतिकारकाचे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -