गौरी देशपांडे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार हाताळले. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले. मराठी साहित्याला स्त्री लेखिकांची मोठी परंपरा लाभली आहे.
ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून ते अगदी आजच्या कविता महाजन, मोनिका गजेंद्रगडकर याच्यापर्यंत असंख्य स्त्रियांनी निरनिराळ्या पातळीवरून स्त्री आयुष्याचे चित्र वाचकांपुढे उभे केले. या सगळ्या प्रभावळीत गौरी देशपांडे यांनी केलेल्या लिखाणाचे वेगळेपण हे विशेष आहे. त्याआधीच्या बर्याचशा साहित्यात स्त्रियांचे कौटुंबिक प्रश्न किंवा पुरुषी वर्चस्वामुळे निर्माण झालेले प्रश्न चर्चिले गेले होते. गौरी देशपांडे यांची पिढी ही स्वातंत्र्योत्तर पिढी होती.
१९६८ साली प्रकाशित झालेला ‘Beetween Births’ हा काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक आहे. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या लिखाण करत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात. ‘अरेबियन नाइट्स’, ‘आहे हे असं आहे’(१९८६), ‘उत्खनन’(२००२), ‘एकेक पान गळावया’(१९८०), ‘गोफ’(१९९९), ‘तेरुओ आणि कांही दूरपर्यंत’(१९८५), ‘दुस्तर हा घाट’ आणि ‘थांग’(१९८९), ‘निरगाठी’ आणि ‘चंद्रिके ग, सारिके ग!’(१९८७), ‘मुक्काम’ (१९९२), ‘विंचुर्णीचे धडे’(१९९६), ‘सात युगोस्लाव लघुकथा’. ‘दार’, ‘मिळून सार्याजणी’(१९९४), ‘धरलं तर चावतंय’(१९९६), ‘भिजत भिजत कोळी’ (१९९३), ‘रोवळी’(१९९३), ‘हिशेब’ (२००१) ही त्यांनी पुस्तके लिहिली. अशा या प्रतिभावान लेखिकेचे १ मार्च २००३ रोजी निधन झाले.