घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥
कर्म करताना जर शेवटास गेले तर ते खरोखर उपयोगालाच आले; परंतु कदाचित विघ्न येऊन अपुरे राहिले, तरीही बरेच झाले, असे समज.
देखै जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे । तरी परिपूर्ण सहजें । जहालें जाणैं ॥
कारण, असे पहा जेवढे कर्म घडेल तेवढे ईश्वराला अर्पण करावे म्हणजे सहजरीत्या पूर्ण झाले, असे समजावे.
देखैं संतासंतकर्मीं । हें जें सरिसेंपण मनोधर्मीं । तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥
आणखी असे पहा की, चांगल्या वाईट कर्माचे ठिकाणी मनोधर्म सारखा राहणे हीच योगस्थिती, असे उत्तम लोक म्हणतात.
अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाणैं योगाचें । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥
अर्जुना, मनाची जी समता तेच योगाचे सार आहे, असे तू समज. ज्या समतेत मन (क्रिया) व बुद्धि (ज्ञान) यांचे ऐक्य असते,
तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था । दिसे हा अरुता । कर्मयोगु ॥
पार्था, त्या बुद्धियोगाविषयी विचार केला असता हा कर्मयोग पुष्कळ प्रमाणात कमी योग्यतेचा दिसतो.
परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जें कर्मशेष सहजें । योगस्थिति ॥
परंतु त्या कर्माचेच आचरण केले तरच हा बुद्धियोग साध्य होतो; कारण कर्माची जी उत्तरावस्था तीच स्वाभाविक योगस्थिती होय.
म्हणौंनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । मनें करीं अव्हेरु । फळहेतूचा ॥
म्हणून अर्जुना, बुद्धियोगच श्रेष्ठ आहे आणि त्याचेच ठिकाणी तू एकाग्र हो; परंतु मनात फलप्राप्तीची आशा करू नको.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -