भोपाळ : मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकांना आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 17 नोव्हेंबरला मध्यप्रदेशमध्ये विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षाचे नेते मतदारसंघात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत, पण असे असताना आता मध्यप्रदेशमधील भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. एका वृत्त समुहाला दिलेल्या मुलाखतीत शिवराज यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे. (Big statement of Shivraj Chauhan regarding Madhya Pradesh election)
हेही वाचा – Election 2023 : छत्तीसगडमध्ये मतदानासोबतच नक्षलवाद्यांच्या कारवायांनाही सुरुवात, 24 तासांत दोन स्फोट
यावेळी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भावाला आधार देण्यासाठी बहिणी एकत्र आल्या आहेत. लाडली बहना योजना असो की लाडली लक्ष्मी योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षण, पोलिसात मुलींची 30 टक्के भरती, किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट भरतीत 35 टक्के आरक्षण असो, आम्ही एक नाही तर अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे मातृशक्ती भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे याच योजना भाजपला या निवडणुकीत विजय मिळवून देणार असल्याचा विश्वास शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला आहे.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवडी संस्कृतीच्या विरोधात भाष्य केले आहे. याबाबत बोलताना चौहान म्हणाले की, ही रेवडी संस्कृती नाही. अर्ध्या लोकसंख्येला हा पूर्ण न्याय आहे. महिलांनाही आमच्या जमिनी आणि संसाधनांवर पूर्ण अधिकार आहेत. तरीही आपण आजही पुरुषप्रधान समाज आहोत हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून, आम्ही ठरवले की आम्ही महिलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू.
तसेच, मी 2017 मध्ये माझ्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोषण पातळी चांगली झाली. ही रेवडी नाही. जेव्हा कुटुंबातील आई, बहीण किंवा मुलीकडे पैसा जातो तेव्हा ती त्याचा चांगला वापर होतो. ती आधी मुलांवर आणि नंतर कुटुंबाच्या गरजांवर खर्च करते. म्हणून, आईला पैसे द्या. प्रशासकीय यंत्रणेपेक्षा ती त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करेल, असेही त्यांच्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.
भाजप विजयी झाल्यावर आपण मुख्यमंत्री होणार का?, या प्रश्नावर उत्तर देताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मला याची काळजी नाही. वैभवशाली, सशक्त आणि समृद्ध भारताची निर्मिती हे राजकारणातील माझे ध्येय आहे. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी भाजपचा कार्यकर्ता आहे. कोण कोणते काम आणि कुठे करणार हे मिशन ठरवेल. तसेच, माझे नाव शिवराज सिंह चौहान आहे. या छोट्या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वावर किंवा कामावर कधीही परिणाम करू शकत नाहीत. तुम्ही काय आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही कसे काम करता हे महत्त्वाचे आहे, असे स्पष्टपणे सांगत चौहान यांनी आपले परखड मत व्यक्त केले.