भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी केलेल्या कामगिरीची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात नोंद करण्यात आली आहे. अभिनंदन पाकिस्तानमध्ये कैद असताना त्यांनी दाखवलेल्या शौर्याचे अजूनही देशभरात कौतुक केले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून तसेच भारत सरकारकडून पाकिस्तानवर अभिनंदन यांना सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांनी अभिनंदन यांना पाकिस्तानातून भारतामध्ये परत पाठवण्यास भाग पाडले. हा सगळा घटनाक्रम चित्तथरारक, उत्कंठावर्धक आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेला होता. त्यामुळे अभिनंदन यांच्यावर चित्रपट करण्याची चढाओढ निर्मात्यांमध्ये सुरू झाली. तसेच अभिनंदन यांची भूमिका साकारण्यासाठी जॉन अब्राहम तसेच अक्षय कुमारही इच्छा व्यक्त करत आहे.
अभिनेत्यांनी केली इच्छा व्यक्त
अभिनेता जॉन अब्राहमने मीडियासोबत बोलताना एक इच्छा व्यक्त केली की, ‘अभिनंदन यांच्यावर चित्रपट येणार असेल तर त्यामध्ये अभिनंदन यांचे पात्र मला साकार कराला मिळाले तर माझ्यासाठी ती भाग्याची बाब असेल’ तसेच अक्षय कुमार ‘केसरी’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना मीडियासोबत बोलत असताना, अक्षयला अभिनंदन यांच्या विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘अभिनंदन यांच्या जीवनावर आधारित येणऱ्या चित्रपटासाठी अजूनही माझ्याकडे निर्माते ऑफर घेऊन आलेले नाहीत. मात्र भविष्यात जर मला चित्रपटाबद्दल विचारण्यास आले तर मी नक्कीच ती भूमिका करेन’.
बॉलीवुडकरांनी केले अभिनंदन यांचे कौतुक
पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यामध्ये तसेच अभिनंदन यांच्या शौर्याचे कौतुक करण्यामध्ये बॉलीवुडमधील मंडळी मागे नव्हती. अमिताभ बच्चन पासून अनुपम खेर, अक्षय कुमार, शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगन यांसारखे अनेक कलावंतानी अभिनंदन यांचे कौतुक केले.अभिनंदन यांच्या सोबत घडलेली घटना देशातील नागरिकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी होती.