ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे नेहमीच काहीना काही वक्तव्य करत असतात. त्यांनी नुकतंच मालिकांचा घसरत चाललेल्या दर्जावर प्रेक्षकांना आवाहन केले आहे. कल्याणमधील सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेतील दुसऱ्या पुष्पात विक्रम गोखले प्रेक्षकांशी संवाद साधत होते. “प्रेक्षकांनी आपला चॉइस तपासून बदलावा आणि स्वत:चा चॉइस निश्चित करा, जेणेकरून अशा सिरियलवर बंधने येतील. अशा भिकार सीरियल पाहणे बंदच करा. याशिवाय तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही पाहताय म्हणून अशा गोष्टींची निर्मिती होतेय. एकदा तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर सीरियलही चांगल्या दर्जाच्या होतील. त्यानंतर सिनेमा, सिरियल आणि नाटकांमध्ये चांगले नट, दिग्दर्शक आणि लेखक घडतील आणि सर्व काही दर्जेदार होईल,” असा विश्वास दाखवत विक्रम गोखले यांनी प्रेक्षकांना आवाहन केले आहे.
या व्याख्यानमालेत विक्रम गोखले प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधत होते. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली असून, हल्ली सर्व माध्यमे पैशाच्या नादात प्रेक्षकांसमोर ढासळलेल्या दर्जाचा कंटेट समोर आणत आहेत. एकंदरीत सिरियल आणि हल्लीचे चित्रपट पाहताना डिजीटायझेशनमुळे संवेदना आणि संवेदनशीलता या दोंन्हीमधील अंतर वाढले आहे. आता कोणतेहा तारतम्य नसलेल्या सीरियलमध्ये घाल पाणी आणि पीठ या न्यायाने प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात असल्याची चिंता विक्रम गोखले यांनी व्यक्त केली आहे.
उत्कृष्ठ पाहा, उत्कृष्ठ अनुभवा, उत्कृष्ठ वाचा. तसेच ते मिळत नसेल तर बंद करा. तुमच्याच हातात रिमोट असल्यामुळे तुम्हाला काय पाहायचे ते तुम्हीच ठरवू शकता. टिव्ही आणि हल्लीची माध्यमे प्रेक्षकांच्या मनोरंजनाची कामे करतात. त्यामुळे आपला जो हेतू आहे मनोरंजनाचा त्याच्यात खरोखरच मनोरंजन मिळतंय का? हेतू काय आहे ते बघण्यामध्ये हे ठरवा. पटत नसेल तर बंद करा. फालतू काहीतरी बघत बसू नका,” असा सल्ला विक्रम गोखले यांनी दिला आहे.
हे ही वाचा – Bigg Boss 15 Winner : तेजस्वी प्रकाश ठरली ‘बिग बॉस 15’ ची विनर