टीव्ही मालिका विश्वातील ‘बिग बॉस’ हा एक लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. ज्याचा नुकताच 18 वा सीजन पार पडला. या सीजनचे विजेतेपद जिंकून अभिनेता करणवीर मेहराने बिग बॉसची ट्रॉफी उचलली. तर रजत दलाल फर्स्ट रनरअप ठरला. यानंतर सोशल मीडियावर करणवीर आणि रजतचे फॅन्स भिडताना दिसले. सोशल मीडियाच्या माध्यमातून करणवीर जबरदस्त ट्रोल केला गेला. ज्यावर त्याने एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्टवर प्रत्युत्तर देताना रजतने एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओतून रजतने करणवीरला धमकीवजा समज दिली आहे.
रजत दलालने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये रजतने म्हटलंय की, ‘खूप आधी असं व्हायचं की एखाद्याने रजतशी पंगा घेतला तर तो जोकरइतकी भीक द्यायचा. पण आता मी ती गोष्ट सोडली आहे. त्यामुळे तुझं भलं यातचं आहे की तू तुझ्या कुटुंबाकडे लक्ष दे आणि माझ्या समीकरणांना सोडून दे. ते तुला आताही दिसत असेल आणि वेळेनुसार दिसतचं राहील. काही बोलायचं असेल तर थेट मला बोला. माझ्या दलाल या नावाला त्यात आणू नका. हिसाब- किताब काय असतो? ते तुला माहीत नाही. या गोष्टींत पडू नको. आयुष्य खूप सुंदर आहे, ते जग ना. इथल्या कोणाला वाईट वाटलं तर तुला खूप समस्या येऊ शकतील. काळजी घे स्वत:ची’.
View this post on Instagram
काय होती करणवीरची पोस्ट?
‘बिग बॉस 18’चे विजेतेपद जिंकल्यानंतर करणवीर सातत्याने ट्रोल होत होता. रजतचे चाहते सगळ्या लेव्हल तोडून करणवीरला ट्रोल करत होते. सतत ट्रोलिंगचा सामना करून वैतागलेल्या करणवीरने अखेर अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने रजतच्या चाहत्यांना खडेबोल सुनावले होते. या पोस्टमध्ये त्याने लिहिलेलं, ‘सर्व ट्रोलर्सना, द्वेष करणाऱ्यांना, बॉडी शेमिंग करणाऱ्यांना, टपरीवर बसलेल्या प्रत्येक छपरींना, कोणताही चेहरा नसलेल्या आणि स्वत:ला आर्मी म्हणणाऱ्या दलाल झुंडला मी सांगतो, तुम्ही माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत’.
‘केवळ मी माझं मत मांडलं म्हणून तुम्ही माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा अपमान केला आहे. यासाठी तुम्ही वेळ काढून माझ्या जुन्या पोस्टवर जाऊन तिथे वाईट कमेंट्स तसेच शिवीगाळ केली आहे. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकशाहीचा चालू असलेला गैरवापर पाहून अगदी धक्काच बसलाय. ज्यांच्या पाठिशी तुमच्यासारखे लोक आहेत, त्यांचे आयुष्यात कधीच आणि काहीचं भले होऊ शकत नाही. तुम्ही चाहते नसून गुंड आहात. विकत घेतलेले आणि पाळलेले आहात. ज्यांचं स्वत:चं सामाजिक अस्तित्त्वचं नाही. तुम्हाला फक्त दुसऱ्यांना खाली पाडून तुमच्या माणसाला वर उचलता येतं. रजत दलाल.. तुझं समीकरण अपयशी ठरलंय आणि करणवीर स्वत:चा खेळ खेळून गेलाय.’ असे म्हणाला.
हेही पाहा –