पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसची खासदार आणि लोकप्रिय अभिनेत्री नुसरत जहाँच्या (Nusrat Jahan) लग्नाची चर्चा अजूनही रंगली आहे. तिच्या लग्नासंदर्भातील वाद आता संसदेत पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षातच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून नुसरत जहाँचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.
संघमित्रा मौर्य म्हणाल्या की, ‘नुसरत जहां यांची वर्तणूक मर्यादेचा भंग करणारी आहे. लग्नाच्या मुद्यावरून नुसरत जहाँ यांनी आपल्या मतदारांना फसवले आहे. शिवाय यामुळे संसदेची प्रतिष्ठाही कलंकित झाली आहे. हा विषय संसदेच्या नीतिशास्त्र समितीकडे पाठवला पाहिजे. तसेच चौकशी करून नुसरत जहाँवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.’
भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांच्या पत्रात नुसरत जहाँ संसदेत पहिल्या दिवशी नव्या नवरीप्रमाणे तयार होऊन येणे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुसरत जहाँच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावल्याचा उल्लेख केला आहे.
सुरुवातीपासून नुसरत जहाँचे लग्न वादात आहे. नुसरतने निखिल जैनसोबत लग्न केले होते. तेव्हा बंगालच्या मौलानांनी नुसरत विरोधात फतवा काढला होता. तसेच संसदेत सिंदूर लावून गेल्यावरही वाद निर्माण झाला होता.
दरम्यान नुसरत जहाँ अलीकडे लग्नाबाबत म्हणाली की, ‘परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. यासोबतच हा एक दोन वेगळ्या विभिन्न धर्मीय वायक्तींमधील विवाह असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे कायदेशीर रित्या हा विवाह वैध नाहीये. हे केवळ एक नाते किंवा लीव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे विभक्त होण्यासाठी कोणत्याही घटस्फोटाची गरजच नाही, असे स्पष्ट केले आहे.’
हेही वाचा – खरंच नुसरत जहाँ आहे गर्भवती; बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा पहिला फोटो व्हायरल