‘फॅमिली मॅन २’ (Family Man 2) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने (samantha ruth prabhu) पती आणि अभिनेता नागा चैतन्यासोबत (Naga Chaitanya) घटस्फोट घेतला आणि चाहत्यांमध्ये नाराजी दिसली. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आजकाल प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करताना दिसते मग तो राजकारणाचा विषय असो, चित्रपट, किंवा कोणाच्या घटस्फोटाचा. नुकतेच कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य आणि समंथा प्रभू यांच्या घटस्फोटाबद्दल एक पोस्ट केली आहे. कंगनाने या जोडप्याच्या घटस्फोटावरून आमिर खानवर चांगलाच निशाणा साधलाय. आमीर खानचे नाव न घेता, कंगनाने त्याला ‘तलाक एक्सपर्ट’ असेही संबोधले आहे. कंगनाच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘जेव्हाही घटस्फोट होतो, तेव्हा चूक नेहमी पुरूषांची असते, असे म्हणणे नेहमी रूढवादी किंवा खूप न्यायनिर्णय वाटू शकते, परंतु देवाने अशा प्रकारेच पुरुष आणि स्त्रीची निर्मिती केली आहे. अशा प्रकारचे वागणे थांबवा जे स्त्रियांना कपड्यांसारखे बदलतात आणि नंतर त्यांना तुमचा सर्वात चांगला मित्र म्हणतात. शंभरातील एक स्त्री चुकीची असू शकते, परंतु सर्वच नाही.
याच स्टोरीमध्ये कंगनाने पुढे लिहिले, ‘अशा लोकांचा धिक्कार आहे ज्यांना मीडिया आणि त्यांच्या चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळत असते. पूर्वीपेक्षा आता घटस्फोटाची संस्कृती अधिक वाढताना दिसत आहे. यानंतर कंगनाने चैतन्य आणि सामंथाच्या घटस्फोटावर देखील प्रश्न उपस्थित केले आहे. इतकेच नाहीतर त्यासाठी कंगनाने थेट आमिर खानला दोष दिल्याचे दिसतेय. नागा चैतन्यने अलीकडेच आमिर खानच्या लाल सिंह चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले. या दरम्यान नागा आणि आमिरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा संदर्भ देत कंगनाने लिहिले, ‘नागा चैतन्यने तिचे चार वर्षांचे लग्न मोडले कारण भूतकाळात तो बॉलिवूड अभिनेता आणि तलाक एक्सपर्ट च्या संपर्कात आला आहे. या अभिनेत्याला घटस्फोटाचा खूप अनुभव आहे, असे खोचक विधान देखील तिने केले.