ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून ‘झाशीची राणी‘ अशी ओळख असणाऱ्या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर ‘स्वोर्डस अँड सेपटर्स‘ नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्रोफेसर आणि भरतनाट्यम विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध इंडो–अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने यात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून, या आंतरराष्ट्रीय चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या मराठी चेहऱ्यांचा वावरदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.
राणी लक्ष्मीबाईची यशोगाथा जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लवकरच पोहोचवणाऱ्या या सिनेमाचा नुकताच तडफदार पोस्टर लाँच करण्यात आला. हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी, यात थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील वापर करण्यात आला आहे. या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शिका स्वाती भिसे असे सांगतात कि, ‘राणी लक्ष्मीबाईचे जीवनचरित्र स्फुरण देणारे आहे. आजच्या स्त्रियांना तिची शौर्यगाथा आणि तिने केलेला संघर्ष प्रेरणादायी ठरणार आहे. कोणत्याही पुरुष पाठबळाशिवाय मुठभर सैनिकांना घेऊन बलाढ्य इंग्रजी सैन्यावर चालून गेलेली ही महिला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा माझा मानस होता. या ज्वलंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची गाथा जगातल्या प्रत्येक स्त्री–पुरुषांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटाचा मोठा पडदा महत्त्वाची भूमिका बजावेल, याची जाणीव मला झाली. आणि त्यामुळेच हा सिनेमा बनवण्याचा मी विचार केला.
भावनाप्रधान अॅक्शनपट मराठी चित्रपट ‘रक्त’ चा मुहूर्त संपन्न
निर्माता चिंटू सिंह आणि दिग्दर्शक पायल लोही यांच्या मराठी चित्रपट ‘रक्त’चा शानदार मुहूर्त नुकताच मुंबईत संपन्न झाला. ‘रक्त’ हा एक भावनाप्रधान अॅक्शनपट आहे. या चित्रपटात आई आणि मुलाची गोष्ट असून एक आई दहा मुलांची काळजी घेऊ शकते, पण दहा मुले मिळून एका आईची काळजी घेऊ शकत नाहीत, अशी या चित्रपटाची वनलाईन आहे. या चित्रपटाचा नायक विश्वास म्हात्रे असून नाना पाटेकर त्याचे आदर्श आहेत. गौरी वानखडे नायिका असून तिची ऑडीशनच्या माध्यमातून निवड झाली आहे.निर्माते चिंटू सिंह या चित्रपटाबद्दल विशेष उत्साही असून एक भावनिक,प्रेक्षकांना आपलासा वाटेल, त्यांचे मनोरंजन करू शकेल अशी दाक्षिणात्य पद्धतीची अॅक्शन असलेला चित्रपट या निमिताने तयार करण्याचा आपला उद्देश असून रत्नागिरी आणि गोव्यात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिका पायल लोही यांनीही मराठीत चित्रपट करणे हे आमचे भाग्य असून या चित्रपटाची कथाच स्टार असून नवोदितांचा प्रेमावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.