११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. परंतु त्यांचं हे नाव बदलून अमिताभ असं ठेवण्यात आलं.
अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. आपल्या अभिनयाने आणि चांगल्या व्यक्तीमत्त्वामुळे अमिताभ यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. आज भारतीय चित्रपटातील प्रभावशाली आणि जेष्ठ अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांचे नाव अभिमानाने घेतले जाते.
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटातील ‘अॅग्री यंग मॅन’ अशी ओळख अमिताभ बच्चन यांची झाली. अगदी बच्चेकंपनीपासून ते वयोवृध्दांपर्यंत सगळेच अमिताभ यांचे चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आईमुळे त्यांची पावलं रंगभूमीकडे वळली आणि याच जोरावर ते मुंबईमध्ये आले.
या कालावधीमध्ये त्यांना वडीलांकडून साहित्याचाही मोठा वारसा मिळाला होता. अमिताभ बच्चन यांचे सुरूवातीचे काही चित्रपट फ्लॉप गेले पण नंतर एका पेक्षा एक हीट चित्रपटांचा सपाटाच त्यांनी लावला. ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ असे एकापेक्षा एक दमदार चित्रपट आजही एव्हरग्रीन आहेत.
चित्रपट गाजविणाऱ्या अमिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.त्यानंतर १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसंच चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांच्या नावे आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेवर निवडून गेले होते.
अमिताभ बच्चन यांचा पुर्नजन्म
अमिताभ बच्चन यांचा कुली चित्रपटाच्या चित्रीकरमादरम्यान एका फायटींग सीन करताना दुखापत झाली. यावेळी ते २ महिने हॉस्पीटलमध्ये दाखल होते. यावेळी अनेकांनी तर अमिताभ बच्चन यांच्या जिवंत राहण्याची आशाच सोडून दिली होती. अनेक चाहते दिवसें दिवस हॉस्पीटलच्या बाहेर बसून राहले. तर कोणी देव पाण्यात ठेवले. मात्र या सगळ्यातून ते सुखरूप बाहेर पडले. यावेळी त्यांचा पुर्नजन्म झाला अस म्हणायला हारकत नाही.