विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर राज्यातील राजकारणामधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या सर्व प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. शिवाय या सगळ्याचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुजरात आणि दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यामुळे मविआ सरकारमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार स्पाइसजेटच्या विमानातून गुवाहाटीकडे रवाना झाले. दरम्यान आता या सर्व घडामोडींवर सर्व स्तरातून येऊ लागल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनंही आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, ‘आम्ही बंड केलं ती आई कालथ्याने चटका द्यायची!
या ट्विटमध्ये हेमंत ढोमेने लिहिलंय की, ‘आम्ही बंड केलं ती आई कालथ्याने चटका द्यायची. पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटीला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती, काय म्हणता?’ शिवाय खाली त्याने #बंड असं सुद्धा लिहिलंय.
आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची!
पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटी ला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती…
काय म्हणता? #बंड— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 21, 2022
हेमंत ढोमेच्या या ट्विटवर युजर्सकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये एकजण म्हणाला की, ‘लहानपणीचं बंड निस्वार्थी, निरागस असायचं,आताच्या राजकारण्यांसारखे कपटी नसायचं’. तर दुसऱ्या एकजण म्हणाला की, ‘आताच्या बंडासोबत बाप असल्यामुळे आई हतबल आहे’. तर काहीजण म्हणत आहेत की, ‘हे सर्व पूर्वनियोजित असतं, आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो’.
सध्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यानी वर्षा बंगल्यावर आमदार आणि खासदारांची बैठक बोलावलेली आहे. आता सरकारच्या बहुमताचा प्रश्न निर्माण झाला आहे.