मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना सध्या कोळी भगिनींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी वर्षा उसगावकर यांनी एका जाहिरातीत काम केले असून, यामध्ये “बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले”, असे वादग्रस्त विधान वर्षा उसगावकर यांनी त्या जाहिरातीमधून केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे, ज्या ऑनलाइन अॅपने ही जाहिरात प्रदर्शित केली आहे त्यांनी कोळी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल, अशी भुमिका मच्छिमारांनी घेतली होती.
दरम्यान, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर या संदर्भात एक व्हिडीओ शेअर करत कोळी समाजाची माफी मागितलेली आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ऑनलाईन कंपनीकडून बनवण्यात आलेल्या जाहिराती मुळे अनावधानाने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागते. माझ्या मनात त्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मला कोळी समाजाचा आदर आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. अशा शब्दांत वर्षा उसगावकर यांनी कोळी समाजाची माफी मागितली आहे.”
काही दिवसांपूर्वी कोळी समाजाचा अपमान करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात म्हटले होते ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’. आता या जाहिरातीपाठोपाठ आणखी एक जाहिरात एका अॅपवर प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत वर्षा उसगांवकर असून त्यांनी यामध्ये ‘मासे खायला मला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत, बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले’ असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.
हेही वाचा :