वादग्रस्त विधान करून खळबळ उडवणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हीने आता शेतकऱ्यांबरोबरच पंगा घेतला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटल आहे. यामुळे संतप्त झालेल्या दिल्लीतील शीख गुरुद्वारा प्रबंध कमिटीने कंगनाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यात कंगनाला जेलमध्ये टाका नाहीतर वेड्यांच्या रुग्णालयात अशी मागणी करण्यात आली आहे.
शीख कमिटीने या तक्रारीत कंगनाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर आक्षेप घेतला आहे. कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी आंदोलन संबोधले असून शीख समुदायाविरोधात अपमानकारक भाषा वापरल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच कंगनाच्या या पोस्टवर शिरोमणी अकाली दलचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंध कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कंगनाला जेलमध्ये तरी टाका नाहीतर वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा असे सिरसा यांनी म्हटले आहे. कंगनाचे विधान हे तिची हीन दर्जाची मानसिकता दाखवत आहे. तीन कृषी कायदे हे खलिस्तानी आंदोलनामुळे रद्द करण्यात आले असे कंगनाने म्हटले आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान असून कंगना ही द्वेषाची फॅक्टरीच झाल्याचे सिरसा यांनी म्हटले आहे. तसेच अशा पद्धतीने सोशल मिडियावर द्वेषपूर्ण पोस्ट टाकणाऱ्याविरोधात सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी करत असल्याचेही सिरसा यांनी म्हटले आहे. कंगनाला देण्यात आलेली सुरक्षा आणि पद्मश्री पुरस्कार ताबडतोब परत घेण्यात यावा . तिला जेलमध्ये नाहीतर मनोरुग्णालयात भरती करावे असेही सिरसा यांनी शीख समुदायातर्फे म्हटले आहे.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रदद् केल्यानंतर कंगनाने नाराजी व्यक्त केली होती. सरकारचा हा निर्णय दु:खद, लज्जास्पद असल्याचा दावा तिने केला होता. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर खलिस्तानी आंतकवाद्यांनी जरी आज सरकारला झुकवले असले तरी कधीकाळी महिला पंतप्रधानांनी यांना धडा शिकवला होता.त्याचा देशाला किती त्रास झाला याची तमा न बाळगता या खलिस्तानीवाद्यांना त्यांनी डासाप्रमाणे मारलं होतं. पण देशाचे तुकडे कधीच होऊ दिले नव्हते. त्यांच्या निधनानंतरही आजही त्यांच्या नावाने लोक चळाचळा कापतात. यांना असाच गुरु हवाय. असे कंगनाने माजी दिवंगत पंतप्रधान इंदीरा गांधी यांचा हवाला देत म्हटले होते.