बिग बॉसच्या घरातून सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी बाहेर पडल्या. आऊ घराबाहेर येणं हा त्यांच्या चाहत्यांसाठीही एक धक्काच होता. घरातून बाहेर पडल्यावर उषा नाडकर्णी यांची काय प्रतिक्रीया होती हे जाणून इच्छा घ्यायची सगळ्यांचीच होती. आऊंनी बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत तलवार का बाहेर नाही काढली नाही असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात आहेत. घरातून बाहेर आल्यानंतर आऊंनी आपलं महानगरशी मनमोकळ्या गप्पा मारल्या..उषा नाडकर्णी यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचीत…
बिग बॉसच्या घरात जाताना मनावर दडपण होतं का ?
मराठी बिग बॉस सुरू होतय म्हटल्यावर मनावर दडपण असण्याचं कारणच नव्हतं. कारण आपलीच सगळी माणसं घरात असणार हे माहित होतं. त्यामुळे खुप आनंद झालेला. पण बिग बॉसच्या घरात आल्यावर सगळ्यांचे खरे स्वभाव कळाले. मी घरात जाऊन खूप धम्माल केली.
घरातल्या कुणाची सगळ्यात जास्त आठवण येईल?
बिग बॉसच्या घरातील सगळेच सदस्य माझे लाडके आहेत. पण मला सगळ्यात जास्त प्रिय त्या घरातलं स्वयंपाकघर होतं. मी माझा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात घालवायचे. सकाळचा पहिला चहा सगळ्यांसाठी दररोज मी करायचे. शिवाय दिवसभरच्या स्वयंपाकातही माझा सहभाग असायचा.
एकूण अनुभव कसा होता?
बिग बॉसमध्ये राहण्याचा माझा अनुभव खरंच चांगला होता. आपल्याच माणसांच्या वेगळ्या बाजू मला समजल्या. माझ्या आतापर्यंतच्या चित्रपटातल्या भुमिका बघून मी सगळ्यांना भांडखोर वाटलेले पण तसं नाहीये. माझ्या आवाजाला साजेशी भुमिकाच मला कायम मिळाली. पण मी प्रत्यक्षात तशी नाही. जो माझा खरा स्वभाव आहे तशीच मी घरात वावरले.
शेवटपर्यंत तलवार का बाहेर नाही काढली?
गेल्या सत्तर दिवसात मी कोणाच्या वाटेला गेले नाही. पण माझ्या वाटेला कोणी लागला तर माझ्या तो माझ्या डोक्यात जायचा. मी खूप सहनशीलता दाखवली. या वयात सतत शांत रहायचं असं ठरवलं होतं मी. अनेक प्रसंग घडले पण तलवार बाहेर काढावीशी वाटली नाही. मला माझ्या मुलानेही परवानगी दिलेली. त्याचप्रमाणे महेश सरांनी अनेकवेळा मी माझं खरं रूप दाखवावं असं सांगितलं पण इच्छाच झाली नाही.
नंदकिशोर चौगुले यांच्याबद्दल तुमच्या मनात आजही अढी आहे का?
नंदकिशोर ज्यावेळी माझ्याबद्दल उशांच्या टास्कवेळी बोलला, त्यावेळी मी त्याला फार काही बोलले नाही पण तो माझ्या डोक्यात गेला. मी भांडण करू शकले असते. मारा- मारीही केली असती. पण प्रेक्षकांना काय वाटेल हा विचार करून मी गप्प बसले. कारण मी भांडले असते तर वाईट ठरले असते. मी खूप सहनशीलता दाखवली. गेल्या सत्याहत्तर दिवसात तोंडातून चुकीचा शब्दही काढला नाही. आता घरातून बाहेर आल्यावर मी कोणाशीच संबंध ठेवणार नाहीये.
मेघा-सई-पुष्कर यांच्याबद्दल शेवटच्या आठवड्यात काय सांगाल?
मेघा खूप हुशार आहे. ती हुशारीने खेळते. पण सई अत्यंत लाडामुळे वाया गेलीय. विकेंडच्या डावामध्येही पुष्कर ज्याप्रमाणे वागला ते मला आवडलं नाही. मेघाने टास्कमध्ये जे केलं ते पुष्करच्या प्रेमापोटी केलं. त्याने सगळ्यांसमोर हे सांगायला नको होतं. तसं मी त्याला बोलूनही दाखवलं. पण या नवीन मुलांना वागण्याची अजिबात शिस्त नाहीये. मी एखादी चांगली गोष्ट जरी सांगितली तरी त्यांना मी डॉमिनेटींग वाटायचे.
बिग बॉसच्या घरात कोण विजेता ठरेल?
मी बिग बॉसच्या घरात जाताना मीच विजेता असेन असं मला वाटलेलं. पण तसं नाही झाली. त्यामुळे कोण विजेता असेल हे मी नाही सांगू शकत. पण मेघा या घरात खूप हुशार आहे. ती उत्तम खेळते.