छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमधून मराठी सिनेसृष्टीला मिळालेला दर्जेदार अभिनेता निखिल राऊत याला शाळेपासूनच अभिनयाची आवड होती. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्याने स्टेज परफॉमन्स करणं काही कमी केलं नाही. शाळेत असताना विविध एकांकिका स्पर्धांमधून पारितोषिकं पटकावणाऱ्या निखिलने आपल्या अथक प्रयत्नांतून या सिनेसृष्टीत पदार्पण केले. पुण्याहून मायानगरी मुंबईत आलेल्या निखिलने सुरुवातील अनेक अडचणींचा सामना केला. मात्र २००९ साली आलेल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोमुळे त्याला राज्यभरात खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्या आधी त्याने उमेश कुलकर्णी दिग्दर्शीत वळू चित्रपटात भूमिका साकारली होती. निखिल राऊतने आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली आहे.
पाहुया निखिलची संपूर्ण मुलाखत …
नुकताच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फर्जंद’ या चित्रपटात निखिलने हेरखात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांच्या गटातील गुप्तहेर किसन ही भूमिका साकारली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत या चित्रपटातील निखिलची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. तर रंगभूमीवर दाखल झालेल्या ‘चॅलेंज’ या नाटकातील स्वातंत्र्या वीर सावरकर यांचीही व्यक्तीरेखा निखिल राऊत साकारत असून त्याच्या या भूमिकेचेही विशेष कौतुक त्याच्या चाहत्यांकडून केले जात आहे. मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारा निखिल भूमिकेचा कार्यकाळ न बघता केवळ त्या व्यक्तीरेखेचे कथेतील महत्त्वा किती आहे, यावर भूमिकांची निवड करतो. अभिनयासोबत निखिलला फोटोग्राफीचीही आवड असून अभिनया क्षेत्रात करिअर केले नसते तर आपण फोटोग्राफर झालो असतो, अशी प्राजंळ कबूलीही निखिलने यावेळी गप्पा मारताना दिली.