हिंदी टेलिव्हिजनवरील मालिका विश्वात गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी निर्माती एकता कपूरचा आज 48 वा वाढदिवस आहे. एकताच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत. एकता मागील अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. एकताने वयाच्या 15 व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. 1994 मध्ये एकताने (ekta kapoor) तिच्या वडिलांच्या मदतीने ‘बालाजी टेलिफिल्म्स’ (balaji telefilms) या कंपनीची स्थापना केली. ‘बालाजी टेलिफिल्म’ (balaji telefilms) या आपल्या स्वतंत्र प्रोडक्शन हाऊस अंतर्गत एकताने आत्तापर्यंत 130 पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती केली आहे आणि म्हणूनच तिला टेलिव्हिजनची क्विन म्हटले जाते. तिच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळाली आहे.
‘या’ आहेत एकताच्या 5 लोकप्रिय मालिका
- हम पांच
झी टीव्ही वरील हम पांच ही मालिका प्रेक्षक आजही विसरू शकत नाहीत. या मालिकेची महत्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेत एकही पुरुष नायक नव्हता. पाच मुलींभोवती फिरणारी ही कथा मोठ्या प्रमाणावर हिट ठरली होती. या पाच मुलींमध्ये असहाय्य पणे अडकलेल्या वडिलांची भूमिका जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी साकारली होती. 1995 ला सुरु झालेली ही मालिका 1999 पर्यंत टेलिव्हिजनवर प्रेक्षक उत्तम प्रतिसादात पाहत होते.
- क्योंकि सास भी कभी बहू थी
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका सुद्धा कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. या मालिकेपासूनच सासू आणि सुनेच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या मालिकांचा एक मोठा ट्रेंड सुरु झाला. 2001 ते 2005 या कालावधीत या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ सुद्धा पटकावला होता. या मालिकेचे 1800 पेक्षा जास्त भाग प्रदर्शित झाले अजून या मालिकेतील प्रत्येक व्हायक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.
- कहानी घर घर की
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी घर घर की’ या दोन्ही मालिका साधारण एकाच वेळी सुरु झाल्या होत्या. अभिनेत्री साक्षी तन्वर हीला या मालिकेमुळे एक नवी ओळख मिळाली. या मालिकेमधून अभिनेत्री साक्षी तन्वर यशाच्या शिखरावर पोहोचली होती. ही मालिका 8 वर्षे सुरु होती. या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा उत्तम प्रदिसाद मिळाला होता.
- जोधा अकबर
2013 ते 2015 या कालावधीत एकता कपूरची निर्मिती असलेली ‘जोधा अकबर’ ही मालिका सुद्धा मोठ्या प्रमाणावर हिट झाली होती. आमेर कुवरी जोधा आणि मुघल बादशहा अकबर यांची कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि एक ऐतिहासिक कथा रंजक पद्धतीने दाखविण्यात आली होती. या मालिकेत रजत टोकस आणि परिधी शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.
- नागिन
एकता कपूरच्या आजवरच्या अनेक मालिका सुपर हिट ठरल्या आहेत. पण या सगळ्यातच टीव्ही वर एकता कपूरची निर्मिती असलेली ‘नागीन’ ही मालिका देखील लोकप्रिय ठरली आहे. आता या मालिकेचा 7 वा सिझन सुरु होणार असून या मालिकेचा पहिला भाग 2015 मध्ये सुरु झाला होता.
एकताने (ekta kapoor)आत्तापर्यंत अशाच हिट मालिका दिल्या आहेत. तिच्या प्रत्येक मालिकेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.