एखादे गाणे गायचे म्हणजे भरपूर रियाझ, तालासुराचे आवश्यक ज्ञान याबद्दल आवर्जून बोलले जाते. एवढी भीती दाखवल्यानंतर इच्छा असतानासुद्धा कोणी कलाकार गाणे गाण्याची तयारी दाखवत नाहीत. पण अलिकडचे संगीतकार थोडे शहाणे झालेले आहेत. गावू इच्छिणार्या कलाकाराचा आवाका लक्षात घेता, गीतकाराकडून तसे गाणे लिहून घेतले जाते आणि संगीतकार त्यापद्धतीनेच स्वरबद्ध करत असतो. संगीतकाराची ही युक्ती इतकी प्रभावी ठरलेली आहे की अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान ते अगदी आताच्या नायक-नायिका म्हणून आलेल्या बर्याचशा नवकलाकारांनी चित्रपटासाठी गाणी गायिलेली आहेत. ललीत पराशर याचा गाणी गाणे हा काही प्रांत नाही. कारण तो रंगमंचावरुन थेट चित्रपटात आला. मालिका, जाहिराती करून अभिनेता म्हणून त्याने नाव मिळवलेले आहे. ललीतचा रोमान्स चुपके चुपके असे म्हणण्याचे कारण म्हणजे या अल्बमसाठी एक नव्हे, दोन नव्हे तर सलग आठ गाणी त्याने गायिलेली आहेत. प्रख्यात शास्त्रीय संगीत कलाकार सोमा घोष यांनी त्याच्या अल्बमचे प्रकाशन केलेले आहे.
सोशल नेटवर्कचा प्रभाव वाढल्यामुळे कुठली कॅसेट कंपनी अल्बम काढण्यासाठी पुढाकार घेत नाही. अल्बम काढायचा झाला तर त्यात कमीतकमी आठ गाण्यांचा समावेश असावा लागतो. जाहिरातबाजी केली तरी सर्वच गाणी रसिकश्रोते ऐकतीलच याची खात्री आजच्या घडीला देता येत नाही. मग जे गाणं अधिक भावते, रसिकांना आवडेल याचा अंदाज घेऊन कंपनीवाले त्या एका गाण्यासाठी प्रयत्न करीत असतात. पण ललीत हा भाग्यवान म्हणावा लागेल. मंजुळ कपूर या दिग्दर्शकाने आठही गाण्यांचे व्हिडिओला आवश्यक असे चित्रीकरण केलेले आहे. हे धाडस निर्माते निर्झर स्वप्ना आणि डिजिटल भागिदार आरडीसी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने दाखवलेले आहे. मोहन शर्मा यांनी या अल्बमसाठी गीते लिहिली असून दीपंकर दास याने या गीतांना संगीत दिलेले आहे. अल्बमचे सादरीकरण, त्याची निर्मिती कशी असावी या विषयीचे मार्गदर्शन जे. एस. मंगल आणि संकलक शंकर यांनी केलेले आहे. ललीत स्वत: गायक आहे म्हटल्यानंतर या अल्बमसाठी विविध व्यक्तीरेखा अभिनेता या नात्याने त्यानेच साकार केलेल्या आहेत. मॉडेल म्हणून प्रतीक्षा, अवंतिका, अंजली यांचा यात सहभाग असणार आहे. दिनेश ठाकूर यांच्याकडे अनेक वर्षे नाटक केल्यानंतर ललीतचा ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘सी कंपनी’, ‘जस्ट मॅरिड’, ‘जब वुई मेट’ या चित्रपटात सहभाग होता.