बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागील काही दिवसांपासून त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामुळे अनेकांनी शाहरुखला ट्रोल देखील केलं. दरम्यान, आता शाहरुख आणखी एका कारणामुळे चर्चेत आला असून यामुळे अनेकजण त्याचं कौतुक करु लागले आहेत. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील कांजवाला अपघातामध्ये अंजली सिंह या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या तिच्या मृत्यूचा तपास सुरु आहे. याचं तरुणीच्या कुटुंबीयांची मदत करण्यासाठी शाहरुखने मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहरुख खानचा मीर फाऊंडेशन करणार मदत
दिल्लीमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री अंजली सिंह नावाच्या एका तरुणीचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पूर्ण देश हादरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजली सिंहच्या कुटुंबात तिची आई आणि लहान भाऊ-बहिण आहेत.अंजली सिंह आपल्या कुटुंबातील कमावणारी एकमेव व्यक्ती होती. त्यामुळे शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनकडून अंजलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार आहे.
काय आहे प्रकरण?
31 डिसेंबरच्या रात्री दिल्लीतील कांजवाला येथे बोलेरो जीपने अंजलीच्या स्कुटीला धडक देऊन अंजलीला खाली पाडले. जीपमध्ये अडकलेल्या अंजलीला जीपने 12 किमी फरफटत नेले. यात अंजलीचा मृत्यू झाला. अपघातात अंजलीच्या अंगावरील सर्व कपडे फाटले. अंजलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी तपास करत तरुणीला धडक देणाऱ्या जीपमधील पाच आरोपींना अटक केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने करुन या घटनेतील आरोपींना अटक केली.
हेही वाचा :