सोनू निगमसोबत घडलेल्या या घटनेनंतर गायक शानने नाराजी व्यक्त केली आहे. शानने इंडियन सिंगर्स राइट्स असोसिएशन (ISRA) ला पत्र लिहीले आहे. हे पत्र शानने सोशल मीडियावर शेअर करून शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शानने या पत्रात लिहिले आहे की, काल रात्री चेंबूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सोनू निगमवर झालेल्या हल्ल्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. एका कलाकारावर हल्ला होणे ही शरमेची बाब आहे. या घटनेनंतर देशातील सर्व गायक काळजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोणत्याही गायक/कलाकारांसोबत अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी महाराष्ट्र सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी हस्तक्षेप करावा अशी आमची मागणी आहे.
View this post on Instagram
गायक शानने केले प्रशासनाला आवाहन
शानने हे पत्र अधिकृतपणे शेअर करत सोशल मीडियावर लिहिले, ही घटना पाहून मला खूप वाईट वाटले, तेही मुंबईसारख्या शहरात अशी घटना घडत आहे…? जे कायदा आणि सुव्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी ओळखले जाणारे शहर आहे. एका व्यक्तीने असे कृत्य केले आहे, जे अजिबात सहन होत नाही. माझे प्रशासनाला आवाहन आहे की तुम्ही अशा गैरवर्तन आणि हिंसाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करा.
हेही वाचा – चेंबूर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला
सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यावर सोमवारी एका कार्यक्रमामध्ये हल्ला करण्यात आला. चेंबूर येथे ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये गायक सोनू याचा देखील कॉन्सर्ट ठेवण्यात आला होता. यावेळी हा कार्यक्रम झाल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना आमदार फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील याच्याकडून सोनू निगम, त्याचा मित्र आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करण्यात आला. यामध्ये सोनू निगमच्या मित्राला आणि सुरक्षा रक्षकाला दुखापत झाली होती. त्यानंतर सोनूने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.