उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. पण अनिल देशमुख यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार नाही असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्षम आहेत, तसंच मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. सोमवारी राष्ट्रवादी नेते पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तसं निवेदन त्यांनी दिलं होतं.
With the whole country, especially youth, seeking a proper investigation into the death of Late Sushant Singh Rajput, I urged Hon. @AnilDeshmukhNCP ji to take national emotions into consideration & initiate a CBI investigation.@HMOIndia @AmitShah @PMOIndia @narendramodi pic.twitter.com/NvHk4wH8nV
— Parth Pawar (@parthajitpawar) July 27, 2020
सुशांतच्या आत्महत्येमुळे देश हळहळला होता. त्याचं अकाली जाणं म्हणजे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या देशभरातील तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेचा मृत्यू आहे. बिहार, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांतून मला ई-मेल, फोन आणि मेसेज येत आहेत. या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली जात आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी सर्वांची भावना आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. जनभावनेची दखल घेऊन आपण हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाकडे सोपवावे,’ अशी विनंती पार्थ यांनी निवेदनाद्वारे केली होती.
१४ जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा तपास सध्या वांद्रे पोलिसांकडून सुरु आहे. आतापर्यंतच्या चौकशीत सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र त्याला कुठले नैराश्य होते, त्याला स्वत:च्या जिवाची भीती वाटत होती, आपले करिअर संपणार, मला कोणीतरी मारणार अशी त्याला नेहमीच भीती वाटत होती. त्याला नक्की कोणाची भीती वाटत होती? करिअरच्या सुरुवातीला चांगले चित्रपट मिळत असताना तो अचानक नैराश्यात का गेला? त्याच्या आत्महत्येमागे बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी कारणीभूत आहे? याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे आता बॉलिवूडशी संबंधित प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.