छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील ‘नट्टू काका’ ही भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे आज कॅन्सरमुळे निधन झालं आहे. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते कॅन्सर या जीवघेण्या आजारावर उपचार घेते होते. मात्र आज अखेर त्यांची कॅन्सर आजाराशी झुंज संपली आहे. शोचे निर्माते असित मोदी यांनी ही माहिती शेअर केली आहे.
यावर असित मोदी यांनी दु:ख व्यक्त करत सांगितले की, नट्टू काका बऱ्याच दिवसांपासून आजारी होते त्यांना कर्करोग झाला होता. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेशी ते सुरुवातीपासूनच जोडलेले गेले होते. नट्टू काकांनी आपल्या विनोदी शैलीतून सर्वांना खूप हसवले. शोमध्ये ते जेठालालच्या सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारत त्यांच्या दुकानात काम करायचे. यावेळी त्यांच्या मजेदार विनोदी हावभावांमुळे ते सर्वांना हसवून लोटपोट करायचे. बाघासोबतचे त्यांचे संबंधही खूप खास होते. शोमध्ये प्रत्येकजण त्यांच्या गोड निखळ हास्य आणि इंग्रजी बोलण्याच्या स्टाईलचे दिवाणे होते.
Hamare pyaare #Natukaka @TMKOC_NTF hamare saath nahi rahe 🙏🏻 परम कृपालु परमेश्वर उन्हें अपने चरणो में स्थान दे और परम शांति दे 🙏🏻 उनके परिवार को ये दुःख सहन करने की शक्ति दे 🙏🏻 #नटुकाका हम आपको नहीं भूल सकते 🙏🏻 @TMKOC_NTF
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) October 3, 2021
वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले
घनश्याम नायक यांचा जन्म १२ मे १९४४ रोजी झाला. ते ७७ वर्षांचे होते. घनश्याम बराच काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्या निधनानंतर आता तारक मेहताच्या टीमकडूनही अत्यंत दु: ख व्यक्त केलं जात आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांचा फोटो शेअर करताना लिहिले – आमचे प्रिय नट्टू काका आता आमच्यात राहिले नाहीत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. नट्टू काका आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही.
अनेक चित्रपटांचा भाग असलेला अभिनेता
घनश्याम नायक यांनी केवळ मालिकांमध्येच नव्हे तर चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. १९६० मध्ये ते अशोक कुमार यांच्या ‘मासूम’ चित्रपटात ते बालकलाकार म्हणून झळकले. यानंतर ते बेटा, तिरंगा, आँखें, लाडला, क्रांतिवीर, आंदोलन, बरसात, माफिया, चाहत, इश्क, चायना गेट, तेरे नाम आणि खाकी यांसह अनेक चित्रपटांचा भाग होते. त्यामुळे घनश्याम नायक यांच्या निधनामुळे विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.