मुंबईः मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या नव्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ चित्रपटावरून मोठं वादंग उठलंय. या चित्रपटावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. दिवंगत ज्येष्ठ लेखक, पत्रकार जयंत पवार यांच्या ‘वरणभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथासंग्रहावर हा चित्रपट आधारित आहे.
विशेष म्हणजे याआधी देखील त्यांनी जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावरून ‘लालबाग परळ’ हा चित्रपट काढला होता. त्यातही गिरणी कामगारांच्या अवस्थेचे अक्षरशः विकृत चित्रण केले होते. दरम्यान आता ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या नव्या चित्रपटावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता तर थेट दिवंगत जयंत पवार यांच्या पत्नी लेखिका संध्या नरे पवार यांनी यावर भाष्य केलंय. लेखिका संध्या नरे पवार यांनी समाज माध्यमांकडे प्रतिक्रिया दिलीय.
”ज्यावर ऑपजेक्शन घेतलाय तो ट्रेलर मी पाहिलेला नाहीये. चित्रपट पाहिला नाही तर मी प्रतिक्रिया का देऊ ?, पुस्तकावर सिनेमा येतोय, पण काही गोष्टीवर ऑपजेक्शन घेतला गेलाय त्याबाबत मला माहिती नाही, मला या विवादावर बोलायचं नाही. माझं मांजरेकरांसोबतसुद्धा याबाबत बोलणे झाले नाही”, असंही दिवंगत जयंत पवार यांच्या पत्नी लेखिका संध्या नरे पवार यांनी सांगितलं. दुसरीकडे या चित्रपटावरून सुरू झालेला वाद काही संपताना दिसत नाहीये.
विशेष म्हणजे चित्रपटातील दाखवण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना पत्र लिहून याबाबत लेखी खुलासा मागितलाय. वरन भात लोन्चा कोण नाय कोन्चा या सिनेमाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला आणि लहान मुलांची अवहेलना करण्यात आल्याच रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केलीय.