मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अल्पशा आजाराने कोल्हापूरात अखेरचा श्वास घेतला. आज कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानापासून सकाळी 11:30 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.

भालचंद्र कुलकर्णी यांचे मराठी चित्रपटसृष्टीला मोठे योगदान आहे, त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक भूमिकेने भालचंद्र कुलकर्णी यांनी छाप सोडली होती.‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, अशा 300 पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले होते. तसेच 1984 साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

भालचंद्र कुलकर्णी अनेक पुरस्कारांनी सन्मानित

भालचंद्र कुलकर्णी यांचे मराठी चित्रपटसृष्टीला मोठं योगदान आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हा त्यांचा अखेरचा पुरस्कार ठरला.

 


हेही वाचा :

महेश मांजरेकरांच्या मुलाचे हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण