मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असणारी अभिनेत्री हेमांगी कवी ही तिच्या अभिनयासोबतच सामाजिक विषयांवरही भाष्य केल्याने नेहमी चर्चेत असते. आता तिने विधवा महिलांना गंगा भागिरथी संबोधण्यावरुन प्रश्न विचारला आहे.
राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा शब्द न वापरता गंगा भागिरथी या शब्दाचा वापर करावा, असा प्रस्ताव तयार केला. त्यावर आता हेमांगी कवीने पोस्ट शेअर करत, प्रश्न उपस्थित केला आहे. ( What exactly will be the difference in addressing Ganga Bhagirathi to Widow Actress Hemangi Kavi s post viral )
हेमांगी कवीची पोस्ट काय?
सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणाऱ्या अभिनेत्रींपैकी हेमांगी कवी ही एक अभिनेत्री आहे. आता ती पुन्हा एकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
हेमांगी कवीने पोस्ट करत म्हटले की, आता विधवेला ’गंगा भागीरथी’ संबोधून आदर/सन्मान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, असं संबोधल्यामुळे नक्की काय फरक पडेल किंवा काय बदल होतील कुणी मला नीट समजावून सांगेल का? तसंच हा हा टिंगल- टवाळीचा विषय नाही मी genuinely विचारतेय याची मंडळाने नोंद घ्यावी, असंही तिने पोस्टखाली म्हटलंय.
( हेही वाचा: नाट्य परिषदेतील सावळा कारभार आणि दहशतवाद रोखायचा आहे – सयाजी शिंदे )
अद्याप कोणताही निर्णय नाही- मंगलप्रभात लोढा
अपंग हा शब्द अपमानकारक असल्याने पीएम मोदी यांनी दिव्यांग हा शब्द सुचवला आणि पुढे आदेश काढत तो सरकारी अधिकृत शब्द बनला. याच पार्श्वभूमीवर आता राज्यभरातील विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार, विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा हा शब्द न वापरता ‘गंगा भागिरथी’ या शब्दाचा वापर करावा असा प्रस्ताव तयार केला जात आहे.
दरम्यान विधवांना गंगा भागिरथी (गंभा) म्हणण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसा अध्यादेश निघालेला नाही. महिला आयोगाकडून याचा केवळ प्रस्ताव आला होता. तो चर्चेसाठी पुढे पाठवला आहे, असा खुलासा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी केला.