गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा विभक्त होणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर चहलने त्याची पत्नी धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतल्याचे समजत आहे. गुरुवारी, वांद्रेमधील कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर अंतिम सुनावणी झाली. युजवेंद्र आणि धनश्री एकमेकांपासून वेगळे झाल्याचे समजताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorced)
कोर्टातील एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी त्यांना काही प्रश्न विचारले. ज्यावर उत्तर देताना दोघांनी म्हटले, ‘आम्ही परस्पर सहमतीने घटस्फोट घेतोय. गेल्या 18 महिन्यांपासून आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे राहतोय’. या प्रकरणाविषयी अधिक सांगायचं झालं तर, चहल आणि धनश्री या दांपत्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये जोडप्याला किमान १ वर्ष एकमेकांपासून दूर रहावे लागते. जे या प्रकरणांत घटस्फोटाचा आधार मानले जाते.
चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाची अंतिम सुनावणी व काही औपचारिक बाबी झाल्यानंतर ते गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फॅमिली कोर्टात गेले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी दोघांना समुपदेशकांकडे पाठवले. साधारण 45 मिनिटं दोघांचे काउन्सलिंग करण्यात आले. दोघांचेही विभक्त होण्याचे निर्णय पक्के असल्याने सुनावणीदरम्यान पुन्हा एकदा कोर्टाने त्यांना वेगळं होण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत जुळवून घेता येत नाहीये असं म्हणत कम्पॅटिबिलिटीचा मुद्दा उचलून धरला. सर्व चर्चा पूर्ण झाल्यानंतर अखेर न्यायाधीशांनी त्यांच्या घटस्फोटावर मोहोर उमटवली. यानुसार आता कायदेशीररित्या युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा पती- पत्नी नसणार आहेत. हा निर्णय संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आला.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या रिलेशनबद्दल सांगायचे झाले तर, दोघांनी ४ वर्षांपूर्वी लग्न केले होते. विशेष म्हणजे त्यांचा प्रेम विवाह होता. लग्नानंतर वर्षभरात त्यांच्यात छोटी मोठी भांडणं होऊ लागली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करणे बंद केले, एकमेकांसोबतचे फोटोदेखील डिलीट केले. ज्यामुळे ते घटस्फोट घेणार अशी चर्चा सुरु झाली होती. अखेर कोर्टाच्या निर्णयानंतर आता चहल आणि धनश्री यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत.
हेही पहा –
Chhaava 2 : छावा 2 येणार, शंभूराजांची अधुरी कहाणी पूर्ण होणार