घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रीय अस्मितेची जाज्वल्य मूर्ती

राष्ट्रीय अस्मितेची जाज्वल्य मूर्ती

Subscribe

भारतीय संस्कृतीचे निस्सीम उपासक, थोर शिक्षणतज्ञ, भारतीय जनसंघाचे संस्थापक, लोकशाही संकेताचे भाष्यकार, अद्वितीय संसदपटूआणि काश्मिरच्या बलिवेदीवर आपल्या प्राणांची आहुती देणारे भारत मातेचे थोर सुपूत्र डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा २३ जून हा स्मृतीदिन. या निमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष लेख..

राजकारणाला नैतिक अधिष्ठान असावे. राजकारण शुद्ध असावे असा उद्देश अनेक महाभाग करत असतात. पण मुळात ते राजकारणात सहभागी होतात तेच मुळी काही स्वार्थी हेतु मनात ठेवून. नाव, लौकिक, पैसा, सत्ता स्थानावरुन इतरांना उपकृत करण्याची संधी मिळल्यामुळे वाढणारे स्वतःचे महत्व अशा एक ना अनेक तर्‍हांनी राजकारणापासून होणारा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी राजकारणाची कास धरणारेच अनेकजण आढळतात. अंगीकृत ध्येवादाला व राष्ट्रीय स्वाभिमानाला प्रतिबंध होऊ लागला तर प्राप्त कर्तव्य म्हणून राजकीय आघाडीवर झुंजण्यासाठी पुढे येणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे दशसहस्त्रेषु एखादेच. आदर्शवादावर या देशातील राष्ट्रीय अभिमान स्थानांवर प्रतिष्ठाकेंद्रावर होणारे प्रहार थांबविण्यासाठी या प्रहारांना प्रतिप्रहारांनी उत्तर देण्यासाठी डॉ. मुखर्जी राजकीय आघाड्यांवर झुंजू लागले. त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेल्या दृष्टीला हे कळून चुकले की, या देशाचे चैतन्य जोपासावयाचे असेल तर केवळ एका विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात काम करून भागणार नाही. या देशाच्या सार्‍या प्रेरणाच नष्ट करण्याची कारस्थाने गतिमान होत असतांना चौफेर लढा देणे जरुरीचे आहे. जनजागरणाचे या देखाच्या राष्ट्रीय अस्मितेचे हे पवित्र कर्तव्य पार पाडण्याच्या भूमिकेतून श्यामाप्रसाद राजकीय आखाड्यात उतरले. त्यांच्या राजकीय कार्याचा पाया हा असा उदात्त ध्येयवादी होता. आपल्या उंच व धिप्पाड देहाने आणि आजवरच्या तेजस्वी जीवनाने प्राप्त झालेल्या नैतिक शक्तीने या देशाचे आपण उत्तम प्रकारे संरक्षण करु, त्यांचे चैतन्य प्रज्वलीत करू अशी ग्वाहीच जणू राजकारणात प्रवेश करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीनी जनतेला दिली. स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांच्या प्रवाहांनी गतिमान झालेल्या या गंगेला राजकारणात साथ देणे आणि प्रखर हिंदूत्वाच्या राष्ट्राभिमानाने खळखळणार्‍या नाशिकच्या गोदावरीने हात पुढे केला. बंगालच्या फाळणीचे वेळेस कर्झनचा कर्दनकाळ झालेले लाल-बाल, १९३२ नंतर मुखर्जी- -सावरकर झाले. केवळ ब्रिटीशांशीच नाही तर त्यांना साथ देणार्‍या जातीय मुस्लिम लीगशी व या दोघांच्या कुटील कारवायांचे भक्ष बनलेल्या काँग्रेसशी तिरंगी सामना देण्यासाठी हा गोदा-गंगा संगम खळखळत पुढे आला. रत्नागिरीच्या नजरकैदेतून मुक्त झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कलकत्ता विद्यापिठाची धूरा उतरवून ठेवून देशकार्यासाठी चौफेर नजर टाकणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची कलकत्ता येथे झालेली भेट हा एक अपूर्व आणि कांचनयोग मानला पाहिजे. कलकत्ता विद्यापीठ व बंगाल विधानसभा यामधील दहा वर्षाच्या कटू अनुभवांनी डॉ. मुखर्जी यांची ही खात्री पटली होती की, या देशाची मातृभूमी म्हणून चिंता करणार्‍या हिंदूंची सुख-दुःखे समजून घेऊन त्यांच्याशी समरस होण्याऐवजी या देशाचे तुकडे करावयास निघालेल्या मुस्लिम लिगशी जवळीकेने वागण्याचे काँग्रेसचे धोरण हे आत्मघातकी अनुनयाचे आहे. हिंदूंच्या हिताला प्राधान्य देणार्‍या राजकीय, सांस्कृतिक संघटना यचा देशाचे खरे कल्याण करू शकतील या स्वा. सावरकरांच्या व डॉ. हेडगेवार यांच्या विशुद्ध विचारसरणीचा प्रभाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर पडला. त्यामुळेच कलकत्ता येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनात श्यामाप्रसादांनी अतीव हिरीरिने व तळमळीने भाग घेतला. हिंदू महासभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची या अधिवेशनात निवड झाली. आज पाकिस्तानची भारतविरोधी, शत्रुत्वाची ठाम भूमिका काँग्रेसलाही क्षणोक्षणी कबुल करावी लागते. हे पाहिल्यावर डॉ. मुखर्जीचा निर्णय किती ऐतिहासिक महत्वाचा व मोलाचा होता याची प्रचिती सहजतेने येते. भारतातील विचारवंत मुस्लिमही आज जेव्हा मुस्लिम लिग फुटीरतेबद्दल व भारताच्या हितसंबंधाच्या आड येणार्‍या तिच्या हिंदूद्वेष्टेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करणारी भाषणे व लिखाण करतांना दिसतात. तेव्हा बॅरिस्टर जीनांच्या मुस्लिम लीगच्या करस्थानाची पावले वेळीच ओळखून देशाला सावध करणार्‍या डॉ. मुखर्जी यांच्या दूरदृष्टीबद्दल आदरच वाटतो. डॉ. मुखर्जीनी हिंदू महासभेच्या सुरू केलेल्या कार्याला बंगाली सुशिक्षितांचा पाठींबा जोरदारपणे मिळू लागला. डॉ. मुखर्जी हे जितके लोकशाही संकेताचे आग्रह धरणारे आहेत, तितकेच त्यांचे अनुयायी लोकशाही सभावर गुंडगिरीने हल्ला करणार्‍यांचा समाचार घेऊन लोकशाहीचे संरक्षण करणारे आहेत हे सुभाषचंद्र बोस यांना कळून चुकले. त्यांनी डॉ. श्यामाप्रसादांची अधिक मैत्री व्हावी म्हणून हालचाल सुरु केली व राष्ट्रासाठी चळवळ करणार्‍या आपल्या पुढील संकल्पना सांगून डॉ. मुखर्जीचे मार्गदर्शन घेतले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या दोनच महिन्यात पाकिस्तानने काश्मिरवर स्वारी केली. काश्मिरविषयक असलेली वडीलोपार्जित भावना आणि शेख अब्दुलांच्या तथाकथित पुरोगामी नेतृत्वाविषयीचा फाजील आत्मविश्वास यामुळे काश्मिरवर सैन्य पाठविण्यास पं. नेहरू तयार होईनात. पण ज्यावेळी काश्मिर पाकिस्तानला जाऊन मिळणेचा घाट घातला गेला आणि डॉ. मुखर्जीनी या प्रश्नावर भारताची प्रतिष्ठा जाते याची जाणीव करून दिली. तेव्हा काश्मिरच्या बाबतीत हालचाल करणेच पंडीतजी तयार झाले. पाकिस्तानशी जशास तसे धोरण ठेवले पाहिजे आणि काश्मिरचा प्रश्न युनोतून काढून घेतला पाहिजे ही डॉ. मुखर्जी यांची भूमिकाच राष्ट्रहिताची होती. याची सत्यता आज अनुभवास येत आहे. (क्रमश:)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -