देशात कोरोनानंतर आता शेतकरी आंदोलनवरच्या ट्विटची लाट आली आहे. जो उठतोय तो ट्विट करतोय. भारतात नक्की काय चाललयं याचा थांगपत्ता नसतानाही रिहानासारखी अमेरिकन पॉपस्टार यावर ट्विट करते. तिची पोहच आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याने आतापर्यंत दिल्लीच्या सीमेवर धुसमुसत असलेले हे आंदोलन जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचतं आणि भारतात शेतकर्यांवर अन्याय होत असल्याचं चित्र निर्माण होतं. जे भारताच्या विकासाआड येणार आहे. यामुळेच परराष्ट्र मंत्रालयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या ट्विट करणार्यांची दखल घेतली असून अशा विविध आंदोलनांना पाठिंबा देणार्यांना राज्यसभेतील आपल्या भाषणात ‘आंदोलनोपजीवी जमात’ असं संबोधलं आहे. जी एक गंभीर बाब असून त्याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे संकेतच मोदींनी दिले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. यात प्रामुख्याने पंजाब, हरयाणासह त्यांना लागून असलेल्या गावातील शेतकर्यांचा समावेश आहे. सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे अदानी आणि अंबानींची तिजोरी भऱेल आणि शेतकरी रस्त्यावर येईल असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. यामुळे हे शेतकरी रेशनपाण्यासह दिल्ली सीमेवर ठिय्या देऊन आहेत. यादरम्यान, सरकार व शेतकरी यांच्यात ११ वेळा चर्चाही झाल्या. पण त्या निष्फळ ठरल्या. गेल्या दोन महिन्यांपासून यावर बातम्याही येत आहेत. पण २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी ट्रॅक्टर आंदोलन करत सरकारला आव्हानच दिलं. आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत लाखोच्या संख्येने आंदोलक जमावाने दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना मारहाण करण्यात आली. वाहनं जाळण्यात आली. शेतकरी व दिल्ली पोलिसांमध्ये संघर्ष झाला आणि तिथेच हे आंदोलन आपण समजतो तितके साधं सरळ आंदोलन नाही हे अधोरेखित झाले. त्यानंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पडली व अनेक संघटनांनी आंदोलनातून काढता पाय घेतला.
यादरम्यान, परदेशात प्रामुख्याने ज्या देशांमध्ये पंजाबी व शीख समुदाय मोठ्या संख्येने आहे त्या देशांमध्ये खलिस्तानी संघटनांनी भारतीय दूतावासाबाहेर भारत सरकारचा निषेध करणारे एकदिवसीय मोर्चेही काढले. पण त्यामुळे तसा फार फरक पडला नाही. पण एक मात्र नक्की दिल्लीतल्या आंदोलनाला वलयं मिळालं. पण जगभरात चर्चिले जाईल असं काही झालं नाही. किंवा भारताला दखल घ्यावी लागेल असही काही घडलं नाही. पण २६ जानेवारीच्या शेतकरी आणि पोलिसांच्या संघर्षाने ते घडवलं. या संर्घषाचे व्हिडीओ व्हायरल झाले. ते रिहानानामक आंतरराष्ट्रीय किर्ती असलेल्या पॉपस्टर सिंगरपर्यंत पोहचले त्यानंतर तिने शेतकरी आंदोलनातला एक फोटो ट्विटमध्ये शेअर करत आपण यावर का बोलत नाही असा जगालाच सवाल केला. बस्स्, रिहानाचं हे ट्विट तिच्या कोट्यवधी चाहत्यांच्या माध्यमातून जगातील कानाकोपर्यात पोहचलं आणि जगाच्या पटलावरील भारताची छवी बदलली. कोरोना काळात लशींचे मोफत वाटप करून चीन व अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांना अप्रत्यक्ष आव्हान देणार्या भारतात शेतकर्यांचा छळ होत असल्याच्या बातम्या परकीय मीडियाने रंगवल्या. त्यात रिहानानंतर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यासारख्या सेलिब्रिटीजनी फोडण्या घातल्या आणि भारतातील शेतकरी आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचला. घरातलं भांडणं चव्हाट्यावर आलं की ते त्या कुटुंबापुरतं कधीच मर्यादित राहत नाही तर ते सार्वजनिक होतं. ज्याचे पडसाद तीव्र असतात. असंच काहीसं या शेतकरी आंदोलनाबाबत झालं आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने या परदेशी ट्विटची दखल घेत एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केलं. ज्यात संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देऊ नये असा खोचक सल्ला देत रिहानासारख्या परकीय व्यक्तींचे कान टोचले. त्यावर अनेकांनी प्रतिक्रीयाही दिल्या. पण तोपर्यंत ज्या भारतावर आरोप होत आहेत त्याचे पंतप्रधान मात्र शांत होते.
जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याने आंदोलकांचे मनोधैर्य अजून बळावले. संपूर्ण देशात ६ फेब्रुवारीला शेतकर्यांनी चक्का जाम आंदोलन पुकारलं. पण २६ जानेवारीसारखी परिस्थिती निर्माण ोहऊ नये म्हणून दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडक बंदोबस्त तर केलाच शिवाय शेतकरी जिथे तळ ठोकून होते तिथे सिमेंटच्या भिंती उभारल्या. जमीनीत खिळे ठोकून शेतकर्यांचा मार्ग अडवला. यामुळे शेतकर्यांना भिंत ओलांडून पाणी आणण्याबरोबरच शौचालयासही जाणेही कठीण झाले. यात महिलांचेही हाल झाले. मीडियाच्या माध्यमातून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. तोपर्यंत रिहानाच्या ट्विटला रिट्विट करत अनेकजणांनी भारतातील शेतकर्यांचा प्रश्न जागतिक केला. त्यात अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस हिचाही समावेश होता. यादरम्यान, शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे ट्विट करत क्रिकेटर सचिन तेंडुलकरसह अनेक बड्या बॉलीवूड हस्तींनी परकीय सेलिब्रिटीजला सुनावले होते. तसेच भारतीयांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा हा डाव असल्याचे सांगत एकजुटीने राहूया असा सल्लाही अनेकांनी दिला. यामुळे शेतकर्यांच्या विरुद्ध बॉलीवूड आणि शेतकरी हितातले हॉलीवूड असा वाद सुरू झाला. पण हे नक्की काय चाललंय, हे सामान्य नागरिकांना खरचं कळत नाहीये. फक्त पंजाब व हरयाणातील शेतकरी पेटले असून महाराष्ट्रात याचा थोडाफार धुरळा उडाला व नंतर खालीही बसला. कारण हातातील शेतीची कामं टाकून आंदोलनात जाऊन बसणे आमच्या शेतकर्यांना परवडणारे नाही. निसर्गाच्या अवकृपेने दरवर्षी महाराष्ट्रात सुका किंवा ओला दुष्काळ होतोच. त्यामुळे शेतीच नुकसान आणि वाढणारा कर्जाचा बोजा याखालीच महाराष्ट्रातला शेतकरी दबला गेला आहे. त्यामुळे या आंदोलनाला आझाद मैदानातून तर नाशिक पुणे महामार्गावर चक्का जाम करून तो जमेल तसा पाठिंबा देत आहे.
एवढे करुनही या शेतकर्यांना जे शक्य झाले नाही ते ट्विटरने केले. पण त्यामुळे भारताची डागाळलेली प्रतिमा सांभाळणे हे दुहेरी आव्हान आता मोदींपुढे आहे. कारण या ट्विटमुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या भारताच्या व्यवहारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात प्रमुख्याने कृषी क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय प्रकल्पांनाही याचा फटका बसू शकतो. एकीकडे कोरोनाकाळात देशाची बिघडलेली आर्थिक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर परकीय गुंतवणूकदारांना भारतात आणण्यासाठी मोदी सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पण शेतकरी आंदोलनासारखे देशातील अंतर्गत प्रश्न जोपर्यंत सोडवले जाणार नाहीत तोपर्यंत मोदी सरकारला शांततेने कारभार करता येणार नाही. त्यातच आता मोदींनी अशा पावसाळी छत्रीप्रमाणे आंदोलनाच्या वेळी उगवणार्यांना ‘आंदोलनोपजीवी जमात’ असे संबोधले आहे. तसेच अशा आंदोलनजीवींपासून सावध राहण्याचे आवाहन करत एक प्रकारे ट्विट करून सरकारला संकटात पाडणार्यांचे महत्व वाढवले आहे. ज्या वेळी देशात कुठे विविध कारणांनी आंदोलने होत असतात, त्यावेळी काही मंडळी असतात, ती त्या ठिकाणी कुणीही न बोलावता अचानक उपस्थित होतात. खरे तर त्या माध्यमातून त्यांना आपले शक्तीप्रदर्शन करायचे असते, काही वेळा आपले खासगी अजेंडे राबवून त्यांना प्रसिद्धीच्या झोतात यायचे असते. अशा माणसांचा थेट त्या आंदोलनाशी काहीही संबंध नसतो, पण ते ऐनवेळी स्वत:ला जोडून घेऊन आपण त्या आंदोलनाशी कसे बांधिल आहोत, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आंदोलनांवर अशा प्रकारे उपजिविका करणारे हे लोक म्हणजे परिजीवी बांडगुळासारखे असतात, ते मुख्य झाडावर जगत असते. त्यावर जगताना त्या झाडाच्या शरीरातून आपल्यासाठी अन्न शोषून घेतात असते, त्यामुळे ते त्या झाडाचे नुकसानच करत असते. तसेच आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे हे लोक वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेत असतात. खरे तर आयतोबा आपले हित साध्य करतात आणि मुख्य आंदोलनाचे नुकसान करत असतात. बरेच वेळा गटागटाने आंदोलनस्थळी आलेली ही मंडळी मूळ आंदोलनाची दिशा भरकटवतात. त्यामुळे आंदोलनाचे नुकसान होते. त्याचा हेतू बाजूला राहतो. कारण या परोपजीवी बांडगुळांना मूळ आंदोलनात तशी फारशी रुची नसते, त्यामुळे मोदींनी आंदोलनांवर उपजीविका करणार्या लोकांपासून जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.