घरफिचर्सजग हे बंदिशाला

जग हे बंदिशाला

Subscribe

जिकडेतिकडे करोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनची एक अनामिक भीती आहे. सगळ्यांनी घरातच राहावं, आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असं तर लॉकडाऊनमधलं फर्मानच आहे. त्यामुळे सगळे घरीच आहेत. बंदिस्त. बंदिवान. ह्या बंदिस्तपणाची जाणीव झाली की बाबुजींचं ‘जग हे बंदिशाला’ आठवतंय. टीव्ही लावला की इटली, अमेरिका, जर्मनी अशी जिकडची तिकडची गंभीर परिस्थिती डोळ्यांसमोरून सरकतेय. हे सगळं कळलं की घराबाहेर पडूच नये असं आपोआप वाटू लागतंय. ‘जग हे बंदिशाला’ हे तर तंतोतंत पटतंय.

आजच्या ह्या वातावरणात काय लिहायचं हा प्रश्न पडला आहे. बाहेर सगळं करोनाचं भयग्रस्त वातावरण आहे. आजुबाजूच्या इतरांप्रमाणेच आशेचा किरण दिसावा ह्याची वाट पाहतोय. तशी वाट पाहण्याशिवाय इतर कुठला पर्यायच नाहीय. अशा वेळी ‘तुम आशा और विश्वास हैं हमारे, तुम धरती और प्रकाश हैं हमारे’ अशी लतादीदींच्या आवाजातली आश्वासक ओळ मनात तरळून जातेय, पण आपणच आपली समजूत काढण्यासाठी केलेला तो एक भाबडा प्रयत्न तर नाही ना, असा आपलाच आपल्याला संशय येतोय.

कारण पुढच्याच क्षणी ‘उजाला’ नावाच्या सिनेमातलं खूप खूप जुनं गाणं मनात डोकावतंय. त्याचे शब्द भलतेच उदासवाणे आहेत – अब कहाँ जाये हम, ये बता ऐ जमीं, इस जहाँ में तो कोई हमारा नही, अपने साये से भी लोग डरने लगे, अब किसी को किसी पर भरोसा नही.

- Advertisement -

अब कहाँ जाये हम, हा त्या गाण्यातला प्रश्नच ह्या वातावरणात आतबाहेर हलवून टाकतोय. आधीच आर्त वाटणार्‍या ह्या प्रश्नात शंकर-जयकिशनने आपल्या चालीतून आणखी आर्तता ओतलीय. मन्ना डेंनी गायलेलं हे गाणं नुसतं आठवूनही आज अक्षरश: अंगावर येतंय…‘अपने साये से भी लोग डरने लगे, अब किसी को किसी पर भरोसा नही,’ हे शब्द तर आजच्या ह्या परिस्थितीला अगदी लागू पडताहेत. स्वत:च्या सावलीलाही लोक भिऊ लागले आहेत. आता कुणाचाच कुणावर विश्वास राहिलेला नाही, असं ते गाणं सांगतंय…आणि खिडकीतून बाहेर पाहिलं तर लोक सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसताहेत.
त्यातच जिकडेतिकडे लॉकडाऊनची एक अनामिक भीती आहे. सगळ्यांनी घरातच राहावं, आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असं तर लॉकडाऊनमधलं फर्मानच आहे. त्यामुळे सगळे घरीच आहेत. बंदिस्त. बंदिवान. ह्या बंदिस्तपणाची जाणीव झाली की बाबुजींचं ‘जग हे बंदिशाला’ आठवतंय. टीव्ही लावला की इटली, अमेरिका, जर्मनी अशी जिकडची तिकडची गंभीर परिस्थिती डोळ्यांसमोरून सरकतेय. हे सगळं कळलं की घराबाहेर पडूच नये असं आपोआप वाटू लागतंय. ‘जग हे बंदिशाला’ हे तर तंतोतंत पटतंय.

मध्येच एखाद्या चुकार पक्ष्यासारखा मोबाईल वाजतोय. घरातल्या माणसाशी तेच तेच बोलून कंटाळा येत असल्यामुळे कुणाचा फोन येणं म्हणजे लॉकडाऊनच्या काळातला विरंगुळा वाटतोय.

- Advertisement -

कुणा दूरच्या नातेवाईकाने केलेला हा फोन आहे.
हॅलो…कुठे आहेस?…नातेवाईक फोनवर नेहमीच्या सवयीचा प्रश्न विचारतोय.
असून असून कुठे असणार!…मी त्याला उत्तर देतोय. त्यालाही आपल्या लॉकडाऊन काळातल्या बावळट प्रश्नाचं हसू येतं.
मग मीच त्याला म्हणतो, – हम हैं वही, हम थे जहाँ…
त्याला पुन्हा हसू येतं. आमचं बोलणं संपल्यावर मला कवी शैलेन्द्रचे ते शब्द पुन्हा आठवतात…हम हैं वही, हम थे जहाँ…आम्ही आज तिथेच आहोत जिथे आम्ही होतो. अगदी खरंय. आम्हाला हलता येत नाहीय. घर मोठं असो की छोटं, आम्ही तिथेच घिरट्या घालत आहोत. तिथेच घुटमळत आहोत…हम हैं वही, हम थे जहाँ. खरंतर संगम नावाच्या सिनेमासाठी शैलेन्द्रनी राज कपूरना गाण्याचा नुसता मुखडा सांगितला होता, जीना यहाँ, मरना वहाँ…इस के सिवा जाना कहाँ. राज कपूरना गाण्याचा तो मुखडा बेहद आवडला होता. शैलेन्द्रच्या तोंडून ऐकल्या ऐकल्या तो मुखडा राज कपूरना लक्षात राहिला होता. पुढं कधीतरी त्या गाण्याचे अंतरे लिहून घेण्याचं राज कपूरच्या मनात होतं. पण त्यांच्या दुर्दैवाने शैलेन्द्र हे जग सोडून गेले. ज्याच्याबरोबर इतके सिनेमे केले, ज्याच्याकडून इतकी गाणी लिहून घेतली, ज्याच्याबरोबर आपल्या मनाचे धागेदोरे जुळले, ज्याच्याबरोबर आपण काळ्यानिळ्या डोळ्यांनी रात्री जागवल्या तो आपला जानी दोस्त असा अचानक निघून गेल्याचं राज कपूरना अतोनात दु:ख झालं होतंं

पुढे ‘संगम’चं काम सुरू झालं. जीना यहाँ, मरना वहाँ हे गाणं ‘संगम’साठी करायचं राज कपूरनी ठरवलं. त्याचे अंतरे लिहिण्यासाठी राज कपूरनी निरनिराळ्या गीतकारांना पाचारण केलं, पण त्यातल्या एकाही गीतकाराचा एकही अंतरा राज कपूरना पसंत पडला नाही. राज कपूर साहजिकच निराश झाले होते, पण शैलेन्द्रचा मुलगा शैली शैलेन्द्रने एके दिवशी भीत भीत राज कपूरना विचारलं…मी लिहून बघू माझे वडील लिहून गेलेल्या गाण्याच्या मुखड्यानंतरचे अंतरे?

राज कपूरनी त्याच्याकडे थोडा निराशेनेच कटाक्ष टाकला. इतर गीतकारांनी प्रयत्न करून पाहिला आहे, त्यात ह्याने एक प्रयत्न करून पाहिला तर बिघडलं कुठे, असं त्यांच्या मनात आलं…आणि त्यांनी शैलेन्द्रंच्या मुलाला त्या गाण्याचे अंतरे लिहिण्याची परवानगी दिली…आणि पुढचा चमत्कार असा झाला की शैली शैलेन्द्रने जे अंतरे लिहून आणले ते बघून राज कपूरचे डोळे चमकले. ते शब्द बघून त्यांना सुखद धक्का बसला. संगम ह्या सिनेमाची कथा आणि त्या गाण्याचा मुखडा ह्याला अगदी साजेसे शब्द शैली शैलेन्द्रने लिहिले होते…ये मेरा गीत जीवनसंगीत कल भी कोई दोहराएगा, जग को हसाने बहरूपियां रूप बदल फिर आयेगा. राज कपूरना त्या शब्दांतला त्यांंना हवा असलेला नेमका अन्वयार्थ मिळाला होता. राज कपूरनी शैली शैलेन्द्रला आनंदाने मिठी मारली.

आज घरात बसल्या बसल्या हे सगळं मनात तरळतंय, आठवतंय.पण अचानक घरातल्या टीव्हीकडे लक्ष जातंय. कुठलीशी वृत्तवाहिनी बातम्या देते आहे. ती जगभरातले आकडे देते आहे. मग ती देशभरातल्या आकड्यांवर येऊन पोहोचते आहे. ते आकडे मन सुन्न करून टाकताहेत. अशा वेळी मनात कविवर्य ग्रेसची लतादीदींनी गायलेली कविता येते आहे – भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते.पण मीच माझी समजूत काढतोय, समजूत घालताना मीच माझ्याशी गुणगुणतोय – दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -