घरफिचर्सथोर समाजसेवक बाबा आमटे

थोर समाजसेवक बाबा आमटे

Subscribe

गुरुवार, २६ डिसेंबर २०१९. थोर समाजसेवक बाबा आमटे यांची १०५वी जयंती. आजन्म समाजसेवेच्या व्रताचे पालन केलेल्या बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत म्हटले जाते. २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांचा जन्म झाला. मुरलीधर देवीदास हे त्यांचे मूळ नाव.

गुरुवार, २६ डिसेंबर २०१९. थोर समाजसेवक बाबा आमटे यांची १०५वी जयंती. आजन्म समाजसेवेच्या व्रताचे पालन केलेल्या बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत म्हटले जाते. २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांचा जन्म झाला. मुरलीधर देवीदास हे त्यांचे मूळ नाव. त्यांचे कुटुंब जमीनदार होते. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये पार पडले. नागपूर विद्यापीठातून १९३४ मध्ये ते बी.ए. आणि १९३६ मध्ये एल.एल.बी. ह्या पदव्या मिळवल्या. डॉक्टर बनण्याचे स्वप्न असलेल्या बाबा आमटे यांनी वडिलांच्या आग्रहाखातर वकील झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ वकिलीसुद्धा केली.
सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत सहभाग घेतला. १९४३ मध्ये वंदे मातरम्ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. १९४९-५० मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे त्यांनी केवळ डॉक्टर्ससाठी उपलब्ध असलेला कुष्ठरोग निदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाप्रमाणेच देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. पंजाब दहशतवादाने धुमसत असताना तेथील नागरिकांना तेसुद्धा भारताचे नागरिक असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी त्याकाळी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी १९८५ मध्ये त्यांनी भारत जोडो अभियानाद्वारे भारत भ्रमण केले. याद्वारे त्यांनी जनतेपर्यंत एकात्मतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात त्यांनी जवळपास १२ वर्षे म्हणजेच एक तप नर्मदेकाठी मुक्काम करत आंदोलनाला पाठिंबा दिला.
बाबा आमटे यांनी आजन्म कुष्ठरोग रुग्णांची सेवा केली. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोगग्रस्तांना आधार देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्याचे महान कार्य त्यांनी केले. यासाठी त्यांनी १९५२ साली वरोड्याजवळ आनंदवनाची स्थापना केली. २००८ पर्यंत हे आश्रम जवळपास ३८०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या कार्याचा विस्तार केला. आज आनंदवनात सर्व जाती-धर्माचे, सर्व थरांतील लोक आहेत. कुष्ठरोग्यांप्रमाणेच अंध, मूक-बधिरांसाठी विशेष शाळा देखील आनंदवनात आहेत. त्याचप्रमाणे कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालय आणि अन्य प्रकल्पांची स्थापना सुद्धा केली. प्रौढ व अपंगांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी त्यांनी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे शेती व शेतीजोड व्यवसायसुद्धा सुरू केले. यामध्ये दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदि कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.
भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत आदिवासींना शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या जातात. याशिवाय या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे सुरू आहेत. बाबा आमटेंच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून डॉ. मंदाकिनी आमटे हे या प्रकल्पाचा समर्थपणे सांभाळ करत आहेत. संवेदनशीलता, धाडस, प्रखर बुद्धिमत्ता, कष्ट करण्याची तयारी, चिकाटी, निश्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य या गुणांच्या आधारे बाबा आमटे यांनी समाजातील दुःखी, कष्टी, दीनदुबळ्यांची, समाजाने नाकारलेल्यांची सेवा केली. बाबा आमटे यांच्या या कार्याला त्यांच्या पत्नी साधना आमटे यांची साथ लाभली. समाजसेवक बाबा आमटे हे प्रतिभावान साहित्यिकसुद्धा होते. त्यांनी ज्वाला आणि फुले आणि उज्ज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले. त्यांच्या समाजकार्याची दखल घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे. ९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि आमटे कुटुंबिय समाजकार्याचा वसा पुढे चालवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -