घरताज्या घडामोडीकायदे पंडित चित्तरंजन दास

कायदे पंडित चित्तरंजन दास

Subscribe

चित्तरंजन दास यांचा आज स्मृतिदिन. चित्तरंजन दास हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदेपंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १८७० रोजी कोलकाता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे विक्रमपूर परगण्यातील. वडील भुवनमोहन कोलकात्यात वकिली करीत. ते ब्राह्मो समाजाचे होते. त्यांचे शिक्षण कोलकात्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय. सी. एस. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली. याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुद्गार काढले. तेव्हा हिंदी लोकांची सभा घेऊन त्यांनी मॅक्लिनचा निषेध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करविले. याचा परिणाम म्हणूनच आय. सी. एस. परीक्षेत ते यशस्वी होऊ शकले नाहीत व अखेर बॅरिस्टर होऊन त्यांना भारतात परतावे लागले (१८९३). विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली साहित्याचा अभ्यास केला. शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कोलकात्यास वकिलीस प्रारंभ केला; पण सुरुवातीस फारसा जम बसेना. म्हणून ते ग्रामीण भागात वकिली करू लागले. या वेळी भुवनमोहन यांना फार कर्ज झाले होते. त्यांनी एके दिवशी आपले नाव दिवाळखोरीत नोंदविले. यामुळे प्रतिष्ठा आणि पैसा या दोहोंना त्यांना काही दिवस मुकावे लागले. चित्तरंजन यांनी या काळात मालंच (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे.

१८९७ मध्ये वंगभंगाची चळवळ सुरू झाली. अरविंद घोष व इतर काही तरुणांवर खटले भरण्यात आले. अलीपूर बाँबकेस म्हणून हा खटला गाजला. अरविंदांकडे पैसे नव्हते. तेव्हा चित्तरंजनांनी आपली घोडा-गाडी विकून स्वेच्छेने हा खटला चालविला. अरविंदबाबू निर्दोषी सुटले (१९०८). त्यानंतर चित्तरंजनांची मोठ्या वकिलांत गणना होऊ लागली. असाच ढाका-कटाचा खटला (१९१०-११) त्यांनी चालविला. त्यांना प्रतिष्ठा आणि पैसाही भरपूर मिळू लागला. महिन्याला पन्नास हजार रुपये त्यांचे उत्पन्न झाले. या वेळी त्यांनी नादार म्हणून पूर्वी नाकारलेले व कालबाह्य झालेले सर्व कर्ज फेडले. त्यामुळे त्यांचा नावलौकिक अधिकच वाढला. यातच ते स्वातंत्र्यलढ्यातील अनेक खटले विनामूल्य चालवीत. अनेक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय संस्थांना त्यांनी लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या.

- Advertisement -

स्वराज्य हे लोकांचे व लोकांसाठी असावे हे त्यांचे सूत्र होते. त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी सतत प्रयत्न केले आणि १९२३ मध्ये हिंदू-मुस्लीम करार घडवून आणला. ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करण्यावर त्यांचा भर होता. पूर्वीप्रमाणे आपली खेडी सुसंघटीत आणि समृद्ध व्हावीत, असे त्यांना वाटे. अशा या महान कायदे पंडितांचे १६ जून १९२५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -