घरफिचर्सतांबा-पितळेच्या भांड्यांचा तांबा-काटा बाजार

तांबा-पितळेच्या भांड्यांचा तांबा-काटा बाजार

Subscribe

पूर्वी याच परिसरात तांब्याच्या भट्ट्या होत्या. त्यावर तांबे वितळून त्याच्या पट्ट्या तयार केल्या जायच्या. पण त्या ठोकून त्यापासून भांडी बनवली जायची. या भट्ट्यांवर अगदी सुरुवातीच्या काळात भंडारी लोक कामे करायचे. मात्र त्यानंतर त्यांची जागा बंगालमधून आलेल्या कारागिरांनी घेतली. या तांब्या-पितळेच्या भट्ट्यांमधून निघणारा धूर विषारी असल्यामुळे नागरी वस्तीतील या भट्ट्या बंद झाल्या. तरीही या भांड्यांना ठोकून घडवणारे काही कारखाने भुलेश्वर अगदी गिरगावातील झाबवा वाडीतही होते.

मुंबईत तांबा-काटा बाजार आहे हे नव्या पिढीला सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही. आता तांबा-काटा बाजाराचे महत्त्व खूपच कमी झाले आहे. पण मी लहान असताना घरात एखादे भांडे विकत आणले की, आई-आजोबा हमखास विचारायचे, तांबा-काटा बाजारातून आणले का? त्यांच्यादृष्टीने भांडे हे केवळ तांबा-काटा बाजारातच चांगले आणि स्वस्त मिळते. पुन्हा त्यात कोणतीही अतिशयोक्ती नव्हती. कारण मुंबईतील भांड्यांच्या बाजारासाठी तांबा-काटा बाजारच प्रसिद्ध होता. एका जमान्यात जेव्हा अल्युमिनियम आणि स्टीलचा वापर होत नव्हता तेव्हा तांबा, पितळेची भांडी खरेदी करण्यासाठी मुंबईकर या तांबा-काटा बाजारात जात होते.

आजही लोक तांबा, पितळेची भांडी या बाजारातून खरेदी करतात. पण सक्ती म्हणून नाही तर हौस म्हणून कारण ही भांडी आता मुंबईत सर्वत्र मिळतात. पूर्वी मात्र तांबा, पितळेची भांडी खरेदी करण्यासाठी तांबा-काटा बाजारात जावे लागयचे. कारण त्याशिवाय मुंबईत इतरत्र ही भांडी अभावाने मिळायची. तर असा हा तांबा -काटा बाजार भुलेश्वर आणि पायधुनीच्या बरोबर मधोमध वसलेला आहे. भुलेश्वरहून मस्जिद बंदरला पायधुनी मार्गाला वळसा घेऊन जाताना हा बाजार लागतो. हा बाजार पूर्वी ब्रिटिश सैनिकांसाठी बांधलेल्या इमारतीच्या तळमजल्याला होता. या इमारतीत साधारणत: दिडशे वर्षांपूर्वी ब्रिटिश सैनिक रहात. मग ही इमारत एका पारसी व्यक्तीने इंग्रजांकडून विकत घेतली. त्याचे नाव आवाभाई होते. त्याच्या नावाने चालवल्या जाणार्‍या संस्थेकडे ही इमारत होती.

- Advertisement -

इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या गाळ्यांमध्ये तांबे-पितळेच्या वस्तू विकल्या जात. हे व्यापारी त्याच इमारतीत वरती रहात होते. आजही काही कुटुंबे तेथे रहातात पण बहुतेकजण तेथील घर विकून निघून गेले आहेत. आज या इमारतीच्या तळमजल्यावर ५७ दुकाने आहेत. पूर्वी याच परिसरात तांब्याच्या भट्ट्या होत्या. त्यावर तांबे वितळून त्याच्या पट्ट्या तयार केल्या जायच्या. पण त्या ठोकून त्यापासून भांडी बनवली जायची. या भट्ट्यांवर अगदी सुरुवातीच्या काळात भंडारी लोक कामे करायचे. मात्र त्यानंतर त्यांची जागा बंगालमधून आलेल्या कारागिरांनी घेतली. या तांब्या-पितळेच्या भट्ट्यांमधून निघणारा धूर विषारी असल्यामुळे नागरी वस्तीतील या भट्ट्या बंद झाल्या. तरीही या भांड्यांना ठोकून घडवणारे काही कारखाने भुलेश्वर अगदी गिरगावातील झाबवा वाडीतही होते. दिवसभर त्यातून ठोकण्याचा आवाज यायचा.

अगदी हल्लीच म्हणजे ९० च्या दशकात हेही कारखाने बंद झाले. पूर्वी प्रत्येकाच्या घरात तांबा, पितळेचीच भांडी दिसायची. अगदी वाटी, चमच्यापासून भले मोठ्या टोपांपर्यंत तांबा, पितळच वापरले जायचे. त्यावेळेच तांब शुद्ध असल्यामुळे ते हवेत फार काळ राहिले तर काळे पडायचे. त्यामुळे त्याला निदान आतून कलई करावी लागायची. हे कलईचे काम भोई नावाचे लोक करायची.

- Advertisement -

ती दादरला नायगाव परिसरात रहायची आणि दिवसभर ‘कलई’, असे ओरडत मुंबईत फिरायची. ते ज्या परिसरात त्याला भोईवाडा असे नाव पडले. एकतर तांब्या, पितळेची भांडी जड असायची. त्यात त्याला कलई करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागायचा. पुन्हा तांबा, पितळ महाग झाल्यामुळे हळूहळू या भांड्यांचा वापर कमी झाला आणि अ‍ॅल्युनिमियम, स्टीलचा वापर वाढला. त्याबरोबर तांबा-काटा बाजाराचे मुंबईचे महत्त्वही कमी झाले. आता पुजेला लागणारी भांडी तेव्हढी तांबा, पितळेची असतात. पण आजही तांबा-काटा बाजारात तांबा-पितळेची कोणतीही वस्तू मिळते. त्याबरोबर येथील दुकानांमधून आता स्टील, अ‍ॅल्युमिनियम, काचेच्या वस्तूही दिसू लागल्या आहेत.

या दुकानांचे मालक बहुतेक कच्छी गुजराती समाजातील आहेत. ते आपला पिढीजात धंदा आजही टिकवून आहेत. तसेच आज मुंबईत ही भांडी तयार करण्याचा कारखाना नसल्यामुळे ती दिल्ली, मद्रास, अहमदाबाद, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून मागवावी लागतात. आज तांबा-काटा बाजारातील भांडी वजनाने हलकी आहेत. जड भांडी लोकांना हाताळायला कठिण जात असल्यामुळे त्यांनी वजनाने हलकी भांडी तयार केली आहेत. पण ती पुर्णत: शुद्ध नाहीत. त्यात इतर धातू मिसळून ती हलकी करण्यात आली आहेत. पण तुम्हाला शुद्ध तांबा, पितळेची जड भांडी हवीत तर तीही येथे मिळतात. फक्त तांब्याची किमत आज ७५० रुपये किलो आहे. त्या किलोच्या हिशोबात तुम्हाला ती भांडी खरेदी करावी लागतात.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -