घरफिचर्सवनस्पतींच्या संवेदना जाणणारा शास्त्रज्ञ

वनस्पतींच्या संवेदना जाणणारा शास्त्रज्ञ

Subscribe

भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्वज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा आज स्मृतिदिन. भारतीय महान शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे नाव अग्रस्थानी येते. वनस्पतींच्या संवेदना जाणलेले डॉ. बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे.

भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्वज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा आज स्मृतिदिन. भारतीय महान शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे नाव अग्रस्थानी येते. वनस्पतींच्या संवेदना जाणलेले डॉ. बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे. पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांची आई साध्वी आणि सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र यांना सभोवतालच्या निसर्गाविषयी कुतूहल होते. आजुबाजूचा निसर्ग पाहणे, त्याचे निरीक्षण करताना निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का? असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असत. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे शिक्षण पार पडले.
डॉ.जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयात दाखल झाले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. १८८५ ते १९१५ अशी तब्बल ३० वर्ष त्यांनी इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन केले. एकीकडे अध्यापनाचे कार्य सुरू असताना जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. यावेळी त्यांनी विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेत बॅटरी तयार केली. त्यांनी लावलेल्या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते. इ.स. १८९६ मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग मार्कोनीने केले, पण त्या पूर्वीच १८९५ मध्ये जगदीशचंद्रांनी ते हे प्रयोग केले होते. अमेरिकेनेसुद्धा आता त्यांच्या या प्रयोगांना मान्यता दिली आहे.
विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेट्स, रेझोनंट रेकॉर्ड्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण, निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यांनी केलेल्या संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. २०१६ मध्ये भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून डॉ. बोस यांनी लावलेल्या शोधाची प्रक्रिया उलगडून दाखवली. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली. जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७ मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रसुद्धा सुरू केलं. अशा या वनस्पतींनाही संवेदना असतात, तेव्हा त्यांचे सुद्धा तेवढ्याच पोटतिडकीने पालनपोषण करा हा महान संदेश जगाला देणारे डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी जगाचा निरोप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -