हे आरोग्यदाता, तू भक्तांच्या आरोग्याची काळजी वाहतोस हे मान्य आहे; पण यंदा तूच जरा प्रकृतीला सांभाळ रे बाबा. कोरोनाच्या तिसर्या लाटेची चाहुल आता लागली आहे. त्यामुळे तू सोंडेला चांगल्या प्रतीचा मलम लावून आलाच असशील. येताना अदृश्य स्वरुपातील मोठासा मास्कही लावला असशील. सॅनिटायझरचे ‘तिर्थ’ही सोबत असेलच तुझ्या. पण या ‘अस्त्रांचा’ फार काळ वापर होऊ नये असं वातावरण तयार कर. आज सॅनिटायझर लावून तुझी आरती घेणार्यांचे हात जळतायत. मास्क लावणार्या रुग्णांचे श्वास गुदमरतायत. सोशल डिस्टंन्सिंगने भक्तांमधला दुरावा वाढतोय. त्यामुळे आता तुच पुढाकार घेऊन कोरोनाचं मळभ दूर कर. .. हे संकटमोचका, हे संकट इतकं मोठं आहे की, तुझ्या दर्शनालाही आम्ही मोहताज होतोय. तुझे मंदिरांचं द्वारच बंद असल्यानं आम्ही आता घरच्या घरीच तुझा धावा करतोय. मंदिरांची दारं उघडावी म्हणून राजकारण जोरदार होतंय. पण त्यात भक्तीभावाचा लवलेशही दिसत नाही. मंदिरांच्या नावानं राजकारण करणार्यांना सुबुद्धी दे. आज मंदिरं बंद आहेत, पण तुझी कमी आमचे आरोग्य सेवक आणि पोलीस बांधवांनी भरुन काढलीय. दिवसरात्र जीवाचे रान करुन त्यांनी आमचे प्राण वाचवले. त्यामुळे या आरोग्यसेवकांना आणि पोलिसांनाच आम्ही सध्या तुझ्या रुपात बघतोय. त्यांना अनुभवतोय. पण या क्षेत्रातील काही राक्षसी वृत्तीच्या डॉक्टरांनी काही महिन्यांपूर्वी देवतांचं सोंग पांघरलं होतं. त्यांना ओळखणं जरा कठीण होऊन बसलं होतं. त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. पण या मंडळींनी त्यांची ‘दक्षिणा’ आमच्या भेदरलेपणाचा फायदा घेत वाढवली. रयतेच्या श्रद्धेचं ही मंडळी श्राद्ध घालत होते आणि व्यवस्था त्याकडे हताशपणे पाहत होती. अशा लोभी डॉक्टरांना सुबुध्दी दे. त्यांना म्हणा काही मूठभर अपप्रवृत्तींमुळे पुण्याचे काम करणार्या समस्त डॉक्टर जमातीकडे संशयानं बघितलं जातंय. त्यांच्यावर हल्ले होतायत. त्यामुळे नैतिकतेच्या पलीकडील अनैतिकतेचं क्षितीज गाठणार्यांना बाप्पा खरंच सुबुध्दी दे..
हे लंबोदरा, हे महोदरा, तुझी लीला आगाध आहे. तुझी माया अतर्क्य आहे. तशीच प्रशासकीय बाबूंचीही लीला अगाध आहे. या लीलेतून त्यांनी रयतेची प्रचंड ‘माया’ संकलित केलीय. कोरोनाचा काळही याला अपवाद ठरत नाहीये. ही माया कोणकोणत्या मार्गाने जमा होतेय हे आम्हा बापुड्यांसाठी अतर्क्यच आहे. या मायेनेच ही मंडळी लंबोदर झालीय. त्यांचे उदर ‘मायेनं’ इतके भरलेय की त्याचा आतल्या आत कधी विस्फोट होईल याचा नेम नाही. कोरोनाच्या साधन-सामुग्री खरेदीतही खाबुगीरी सुरू होती. पण त्यावेळी निकड होती ती सामुग्रीची. त्यामुळे आम्हाला सगळं कळत असूनही रुग्णहित लक्षात घेऊन नाईलाजास्तव तोंडावर बोट ठेवावं लागलं. पीपीई किटच्या नावानं रुग्णांची अक्षरश: लुबाडणूक सुरू होती. अव्वाच्या सव्वा बिले रुग्णांच्या हातात देत त्यांना कंगाल केलं जात होतं. महत्वाचं म्हणजे हे सगळं प्रशासनाला ठाऊक असूनही संबंधित हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई झाली नाही. यातच सारं काही आलं. म्हणूनच प्रशासनाला सुबुध्दी दे. कोरोनानंतर या लंब उदरातून मोठी ‘साधनसामुग्री’ बाहेर येईलच म्हणा! दुसरीकडे या काळात स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचाही ‘प्रसाद’ सर्वत्र वाटला जातोय. ते टाळण्यासाठी आमचे सरकारी बाबू काळजी वाहत नाहीत, असे बिलकूलच नाही. औषध फवारणीचे कोटी-कोटी खर्चाचे कंत्राट देऊन साथ आटोक्यात आणण्याचा ही मंडळी आटोकाट प्रयत्न करताहेत; पण या औषधांनी डास मरतच नाहीत. उलट ते मदिराप्राशन केल्यागत काही काळ झुलतात अन् नंतर पुन्हा नव्या दमानं चावण्यासाठी सज्ज होतात. त्याला प्रशासन ते काय करणार? बरं, त्यात ठेकेदाराचीही काय चूक. त्याला मिळणार्या निधीतून इतके वाटप करावे लागते की फवारणीच्या औषधालाही निधी शिल्लक राहत नाही. अशा वेळी तो औषधात पाणी ओतणार नाही मग काय करणार? त्यापेक्षा तूच हातापायांना क्रीम लावून मंडपात बस.
हे सुखकर्त्या, तू दु:खहर्ता आहेस. पण याचा प्रत्यय आम्हाला येताना सध्या तरी दिसत नाही. सत्ताधारी आणि त्यांना लटका विरोध करणार्यांच्या ‘सुखा’ला आणि रयतेच्या दु:खाला पारावार उरलेला नाही. तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या संकटकाळात आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देणं गरजेचं असताना राजकारणं करणं ही मंडळी सोडत नाहीत. तुला खरं सांगू का? ‘तिसर्या लाटेसाठी प्रशासन सज्ज आहे’ असं बातम्यांमध्येच सांगितलं जातंय. प्रत्यक्षात परिस्थिती पूर्वीइतकीच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक उदासीन आहे. कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसा स्टाफ नाही. वैद्यकीय सामुग्रीही पुरेशी नाही. अत्याधुनिक साधन-सामुग्री असूनही ती बंद अवस्थेत आहे. औषधांचा पुरेसा साठा नाही. लसीकरणाला सतराशे साठ अडचणी येताहेत. पहिला डोस झाल्यानंतर तीन-तीन महिने दुसरा डोस मिळत नाही. अशात जर तिसरी लाट आली तर बाप्पा तुझे भक्त वाचतील कसे? पण ज्यांच्या शिरावर व्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना याचं काहीएक देणंघेणं नाही. कुणाला खुर्चीवरुन खाली खेचायचं, कुणाला ईडीच्या फेर्यात अडकवायचं, कुणाला सीबीआय चौकशीपासून वाचवायचं, कुणाचं आरक्षण घालवायचं, कुणाच्या आरक्षणाची केंद्रातून कोंडी करायची, कुणाला ‘टार्गेट’ करायचं अन् कुणाचं १०० कोटींचं ‘टार्गेट’ पूर्ण करायचंय, कुणाला पाण्यात बघायचं आणि कुणाला पाणी पाजायचं ही आणि यासारखी असंख्य खलबतं या काळातही अव्याहतपणे सुरुच आहेत. हे काम जितकं प्रभावीपणे सुरू आहे, तितकं प्रभावीपणे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही याचंच दु:ख. लोक रस्त्यावर मरो वा तडफडो, त्यांना हॉस्पिटल मिळो वा ना मिळो, त्यांना व्हेटिलेटर्स मिळो वा श्वास कोंडो, या मंडळींना त्याच्याशी काहीएक देणंघेणं नाही. या उलट ‘देणंघेणं’च्या विषयात हे सर्वच एकदिलाने एकत्र येतात, हे तुला नव्यानं सांगायला नको!
हे बुद्धिदायिनी देवता, सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो श्री गणेश तो तूच आहेस; तूच महामती आहेस. पण कारभार्यांच्या बाबतीतच तू ’लोडशेडिंग’ का करतोस, हे गणित उमजतच नाही. बाप्पा, ही मंडळी बुद्धीचा वापर करीत नाहीत, असा तुझा गैरसमज असेल, तर तो तू कृपया काढून टाक. ही मंडळी बुद्धीचा वापर तहकूब प्रस्ताव गुपचूप मंजूर करण्यासाठी, इच्छित कंत्राटदाराला ठेका मिळवून देण्यासाठी आणि पदोन्नती तालिकेतील अखेरच्या क्रमांकाच्या अधिकार्याला पहिल्या क्रमांकावर आणून ठेवण्यासाठी करीत असतात. कोरोनाकाळातही हे सारं सुरूच आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेला दाद द्यावी तितकी थोडीच आहे. राज्याचा विकासाचा आराखडा ही मंडळी करणार नाहीत; पण टक्केवारीची समीकरणं मात्र चुटकीसरशी सोडवतात, हे विशेष. या मंडळींना सुबुद्धी दे. हे रक्षणकर्त्या, तू भक्तांचं रक्षण करतोस. पण तरीही महिला सुरक्षित नाहीत, हे दुर्दैवानं सांगावं लागतंय. रोज कुठंतरी एक ‘निर्भया’ हुंदके देत असते. कुठंतरी तिचा शेवटचा हुंदका ऐकू येतो. बालिकांपासून वयोवृध्द महिलांपर्यंत कुणीच सुरक्षित नाही. त्यामुळे ज्यांच्या खांद्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांना अधिक सक्षम कर. बळ दे. बलात्कार करणार्या राक्षसांचा विनाश कर.
हे संकटमोचना, जगातील सार्याच संकटांचा तारणहार तूच आहेस; पण गणेश चतुर्थीच्या दिवशी वाहनांच्या गर्दीला ‘ओव्हरटेक’ करण्यात तुमच्या मूषकराजाची जी दमछाक झाली असेल त्याची कल्पनाही करवत नाही. कारण काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता रस्तेच असे झालेयत की रस्त्यांना छोटेखानी पर्वतरांगांचं स्वरूप आलंय. हे पर्वत आणि त्यांच्याजवळील दर्या पार करताना त्याला किती कष्ट सहन करावे लागले असतील हे तुम्ही आणि तुमचा मूषकराजच जाणो. काल-परवा जाहीर झालेल्या संचारबंदीमुळे रस्ते रिकामे होतील त्यामुळे मूषक ‘पार्क’ करायला जागा मिळेल वगैरेसारख्या कल्पना तू करूच नकोस. कारण आम्ही आजही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर हिंडतोय. ट्रॅफिक नेहमीसारखीच जाम होतेय. गर्दीतून कोरोनाचा फैलाव झाला तरी बेहत्तर, पण आम्ही आमचा बेशिस्तपणा सोडणार नाही, असाच जणू संकल्प आम्ही केलाय.
हे कृष्णपिंगाक्षा, तुझ्या काळेभोर अन् नक्षीदार नयनांची मोहिनी सार्यांनाच पडते. या नयनांनी तू विश्वावर लक्ष ठेवतोस. पण आता आमच्या नयनांमधील आसवं पुसण्यासाठी तू आमच्यात ये. आमच्या डोळ्यातील दु:ख समजून घेण्याची ताकद ‘व्यवस्थे’ला दे. या काळात कुणाचे पितृछत्र हरपलंय. तर कुणी मातृप्रेमाला पोरकं झालंय. कुणी आपल्या बछड्यांना गमवलं, तर कुठं सख्या शेजार्यांना हिरावून नेलं. या सर्वांच्याच कुटुंबियांना हे आभाळाएवढं दु:ख पेलण्याची शक्ती दे.. त्यांना या दु:खातून बाहेर काढण्याचे बळ दे..राज्य आणि केंद्रातील सरकारमधील धुरिणांना जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची सुबद्धी दे. देशातील एक टक्का कोट्यधीशांना आपल्या संपत्तीतील वाटा गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्च करण्याची बुद्धी दे. हे विघ्नाधिपती, तू एकाएकी चमत्कार घडवं आणि आलेल्या संकटाचा नाश कर अशी अपेक्षा आम्ही मुुळीच करणार नाही. हे संकट आम्हीच ओढवलंय. तुझ्या निसर्ग नियमांना आम्हीच फाटा दिलाय. तू बनवलेल्या सृष्टीशी आम्हीच खेळलोय. त्यामुळे तुला दोष देणार नाही की तुझ्या अस्तित्वावर शंकाही घेणार नाही, पण या काळात ‘संकट हीच संधी’ समजणार्यांना सुबुद्धी दे इतकंच कर, बस्स !