घरफिचर्सप्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर

प्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर

Subscribe

बाळकृष्ण भगवंत बोरकर हे मराठीतील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार होते. बोरकर यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1910 रोजी कुडचडे (गोवा) येथे झाला. त्यांचे शिक्षण धारवाड येथे मराठी तीन इयत्ता व इंग्रजी मॅट्रिकपर्यंत झाले (१९२८). पोर्तुगीज टीचर्स ट्रेनिंग कॉलेजची प्रमाणपत्र परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. गोव्यातील खासगी व सरकारी हायस्कूलांमध्ये ते शिक्षक होते. काही काळ मुंबईच्या विविध वृत्तपत्रात त्यांनी नोकरी केली. १९४६ मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्य-आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आमचा गोमंतक (१९४८) व पोर्जेचो आवाज (कोकणी, १९५५) या पत्रांचे ते संपादक होते. आकाशवाणीच्या पुणे-पणजी केंद्रांवर, वाङ्मय विभागात, १९५५ ते १९७० पर्यंत काम करून ते निवृत्त झाले.

प्रतिभा हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह मडगाव येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनात प्रसिद्ध झाला (१९३०). त्यानंतर जीवन संगीत (१९३७), दूधसागर (१९४७), आनंद भैरवी (१९५०), चित्रवीणा (१९६०), गीतार (१९६६), चैत्रपुनव (१९७०) आणि कांचनसंध्या (१९८१) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सासाय हा त्यांचा कोकणी काव्यसंग्रह १९८१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला त्या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. १९८१ मध्येच कालिदासकृत मेघदूताचा त्यांनी केलेला समवृत्त, समश्लोकी मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. बोरकरांचे व्यक्तिमत्त्व व कवित्व संस्कारबहुल आहे.

- Advertisement -

तसे ते परंपराप्रेमी पण त्यांच्या परंपराप्रेमावर झालेल्या सुभग व रसपूर्ण संस्कारांनी त्यांना ‘कवी’ बनविले. ग्रीकांच्या सौंदर्यदृष्टीचे मर्म पाश्चात्य साहित्याच्या अध्ययनाने आणि पौर्वात्य आत्मदर्शनाचे स्वरूप मराठी संतांच्या अभ्यासातून त्यांनी आत्मसात केले. बालकवी आणि विशेषतः तांबे यांच्या कवितेचा आदर्श त्यांच्यापुढे होता. निसर्गसौंदर्य व स्त्रीलावण्य यांच्यामधून बोरकरांना जीवनचैतन्याचा साक्षात्कार झाला. निसर्ग व प्रणय यांची त्यांच्या कवितेतील अनुभूती सर्जनशील व ऐंद्रिय होती.

बोरकरांच्या कथा प्रियदर्शिनी (१९६०) आणि समुद्रकाठची रात्र (१९८१) ह्या संग्रहांत समाविष्ट झालेल्या आहेत. मावळता चंद्र (१९३८), अंधारातील वाट (१९४३) व भावीण (१९५०) ह्या त्यांच्या तीन कादंबर्‍या होत. यापैकी भावीण विशेष गाजली. तिची पाच भाषांत भाषांतरेही झाली आहेत. कागदी होड्या (१९३८) या त्यांच्या लघुनिबंधसंग्रहात काव्य व चिंतन यांचा मधुर मिलाफ आढळतो. चांदण्यांचे कवडसे हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह १९८१ मध्ये प्रसिद्ध झाला. आनंदयात्री रवींद्रनाथ (१९६३) हे टागोरांचे चरित्रही त्यांनी मोठ्या समरसतेने लिहिले.

- Advertisement -

बोरकरांना कवितेबद्दल महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक (१९३४), भावीण कादंबरीबद्दल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक (१९५०), आनंद भैरवी, चित्रवीणा, गीतार, आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके, असे सन्मान लाभले. राष्ट्रपतींनी ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला (१९६७). स्वातंत्र्यसंग्रामात बोरकर ह्यांनी केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारतर्फे त्यांना ताम्रपट देण्यात आला (१९७४). अशा या प्रसिद्ध कवीचे ८ जुलै १९८४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -