कन्नड लेखक गिरीश कर्नाड (जन्म ः 1938) हे विचारवंत नाटककार आहेत. त्यांना भारतीय इतिहासात भरपूर रस आहे आणि गतीसुद्धा. आता त्यांच्या ताज्या नाटकाची ‘राक्षस तांगडी’ची अभ्यासकांत आणि नाट्य रसिकांत चर्चा सुरू आहे. यात त्यांनी दक्षिण भारतात चौदाव्या शतकात असलेले हिंदूंचे विजयनगरचे साम्राज्य आणि ते संपवणारे मुस्लिमांच्या शाहया यांच्यात ‘राक्षस तांगडी’ या गावी झालेली लढाई केंद्रस्थानी ठेवले आहे.
1960 च्या दशकांत गिरीश कर्नाड (कन्नड), विजय तेंडुलकर (मराठी), बादल सरकार (बंगाली) व मोहन राकेश (हिंदी) या चार नाटककारांनी भारतीय रंगभूमीवर ‘आधुनिकता’ आणली, असे अभ्यासक दाखवून देतात. यातही तेंडुलकर, सरकार, राकेश या तीन नाटककारांनी सामाजिक विषयांवर प्रकाश टाकला तर कर्नाडांनी भारतीय परंपरेचा, इतिहासाचा अभ्यास करून त्यातील विषय निवडून त्यांना नाट्य रूप दिले. ज्या काळात कर्नाड तरुण लेखक म्हणून धडपडत होते तेव्हा कन्नड साहित्यात पाश्चात्य साहित्यविचारांचे वारे वाहत होते. कर्नाडांची याच्याशी नाळ जुळत नव्हती. त्याच काळात म्हणजे 1951 साली त्यांच्या वाचनात सी.राजगोपालचारी यांचे ‘महाभारत’ वाचण्यात आले व त्यांना सूर सापडला. यातूनच त्यांचे 1961 साली ‘ययाती’ हे पहिले नाटक लिहिले गेले. तेव्हा कर्नाड अवघे 23 वर्षांचे होते.
या नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर कर्नाडांनी 1964 साली दिल्लीचा वादग्रस्त सुलतान तुघलकच्या जीवनावर ‘तुघलक’ नाटक लिहिले. त्यानंतर 1971 साली त्यांचे ‘हयवदन’ आले जे एका पौराणिक कथेवर आधारित होते. त्यांच्या अफाट आणि अर्थपूर्ण साहित्य सेवेबद्दल भारत सरकारने त्यांना 1992 साली ‘पद्मभूषण’ प्रदान केले तर 1998 साली त्यांना ‘ज्ञानपीठ’ मिळाले होते.
हे तपशील समोर ठेवले म्हणजे गिरीश कर्नाडांच्या नव्या नाटकाबद्दल, ‘राक्षस तांगडी’ बद्दल एवढे कुतूहल का आहे, हे लक्षात येर्इल. शिवाय या नाटकाचा विषय अतिशय वादग्रस्त आहेच. भारतातील शेवटचे हिंदूंचे साम्राज्य म्हणजे विजयनगरचे साम्राज्य व ते नष्ट करणारे मुस्लीम राज्यकर्ते. आजच्या स्फोटक राजकीय वातावरणात या नाटकाचे कसे स्वागत होर्इल याची काळजी आहेच. शिवाय या नाटकाचे प्रयोग तरी व्यवस्थित होतील का याबद्दलही मनात शंका आहेतच. ‘मंटो’ या सिनेमाचे प्रयोग बंद झाले (की बंद पाडले?) आहेत. अशा स्थितीत ‘राक्षस तांगडी’च्या भवितव्याविषयी मनात शंका येणे स्वाभाविक आहे.
कर्नाडांनी ‘राक्षस तांगडी’सारख्या वादग्रस्त विषयाला हात घालण्याअगोदर भरपूर अभ्यास केलेला आहे. एक समाज म्हणून आपल्याला अजूनही स्थळ, काळाचे तपशील व्यवस्थित नोंदवण्याचे भान नाही. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद अजूनही संपलेला नाही, हे याचे उत्तम उदाहरण. अशा स्थितीत अनेक ठिकाणी स्पष्ट पुरावेच उपलब्ध नसतात. म्हणूनच कर्नाडांसारखा अभ्यासू नाटककार ‘राक्षस तांगडी’त कोणती भूमिका घेतो व त्या समर्थनार्थ कोणते पुरावे मांडतो याबद्दल कुतूहल आहे.
त्र्यं. चि. शेेजवलकरांसारख्या मराठ्यांच्या इतिहासकारांना विजयनगरच्या साम्राज्याबद्दल विशेष प्रेम होते. शेजवलकरांनी तर ‘विजयनगरचे ऋण’ या शिर्षकाचा एक लेख लिहिलेला असून यात त्यांनी शिवाजी महाराजांसमोर विजयनगरसारखे साम्राज्य उभे करावे असे स्वप्न होते, अशी मांडणी केलेली आहे.
विजयनगर साम्राज्याचा काळ इ.स. 1336 ते 1646 पर्यंतचा समजला जातो. या साम्राज्याची मुहूर्तमेढ हरिहर पहिला याने रोवली. अभ्यासक असे दाखवून देतात की उत्तर भारतातून येऊ बघणार्या मुस्लीम आक्रमणाला लगाम घालण्यासाठी या साम्राज्याची स्थापना केली गेली. या साम्राज्याची राजधानी विजयनगर या शहरात होती. म्हणून या साम्राज्याला ‘विजयनगरचे साम्राज्य’ म्हणतात. कृष्ण देव रायचा काळ (15091529) या साम्राज्याचा वैभवाचा काळ समजला जातो. त्याच्यानंतर अच्युत देव राय याच्याकडे साम्राज्याची सूत्रं आली. अच्युत देव राय यांचे इ.स. 1543 मध्ये निधन झाले व त्याचा चुलत भाऊ सदाशिव राय हा गादीवर आला; पण तो खूपच तरूण असल्यामुळे खरी सत्ता अलिया राम रायाच्या हातात होती. अलिया राम राय हा कृष्ण देव रायचा जावई होता. अलिया राम रायचे वेगळेपण म्हणजे तो इ.स. 1512 च्या पुढे काही वर्षे गोवळकोंड्याचा सुलतान कुली कुत्ब अल मुल्कच्या सेवेत होता. कृष्ण देव रायच्या मुलीशी लग्न झाल्यानंतर अलिया राम रायने मुस्लीम सल्तनतची नोकरी सोडली व विजयनगरमध्ये आला. येताना त्याने काही मुस्लीम सरदारांना विजयनगर साम्राज्यात आणली. अलिया राम रायाने हळूहळू सर्व सत्ता स्वतःच्या हातात घेतली व जेव्हा सदाशिव राय मोठा झाला तेव्हा त्याला तुरूंगात टाकले.
विजयनगरच्या उत्तरेला असलेले मुसलमान सरदार एकत्र आले व त्यांनी जानेवारी 1565 मध्ये विजयनगरवर चढाई केली. विजयनगरचे सैन्य आणि मुसलमानी सल्तनत ‘राक्षस तागडी’ या गावी एकमेकांना भिडले. यालाच ‘तालिकोटची लढाई‘ असेही म्हणतात. या लढार्इत विजयनगरचे सैन्य सुरुवातीला जिंकत होते; पण ऐन मोक्याच्या वेळी विजयनगरच्या सेवेत असलेल्या दोन मुसलमान सरदारांनी गद्दारी केली व विजयनगरचा पराभव झाला. त्या मुसलमान सरदारांनी अलिया राम रायला पकडले व जागच्या जागी त्याचा शिरच्छेद केला. आपला मुख्य सरदारच मारला गेला म्हटल्यावर विजयनगरच्या सैन्यात गोंंधळ निर्माण झाला व अभूतपूर्व पळापळ सुरू झाली. तेथून विजयनगरच्या साम्राज्याला उतरती कळा लागली.
असा वादग्रस्त विषय निवडून गिरीश कर्नाडांनी ‘राक्षस तांगडी’ हे नाटक लिहिले आहे. विजयनगरचे साम्राज्य बव्हंशी आजच्या कर्नाटकात पसरलेले होते. म्हणूनच अनेक कन्नड लेखकांना विजयनगरच्या साम्राज्याबद्दल लिहावेसे वाटते. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. 1919 साली मस्ती व्यंकटेश अय्यंगार यांनी या विषयावर ‘तालिकोट’ हे कन्नड नाटक लिहिले होते. आता कर्नाडांचे ‘राक्षस तांगडी’ येत आहे.
आजच्या भारतात जातीयुद्धं व धार्मिक युद्धं धुमाकूळ घालत आहेत. दररोज दलितांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या येत असतात, तसेच हिंदु मुस्लीम दंग्यांच्या बातम्या येत असतात. या राजकीयसामाजिकसांस्कृतिक वातावरणात गिरीश कर्नाडांचे नवे नाटक काय संदेश देते याकडे लक्ष लागले आहे.