घरफिचर्सया आडनावांचं करायचं काय?

या आडनावांचं करायचं काय?

Subscribe

आडनावं आपली जात चटकन सांगतात. आपलं एखादं आडनाव असणं यात आपलं कर्तृत्व वा आपल्याला लाज वाटण्यासारखं काय असतं? हेच कळत नाही. बहुसंख्य आडनावं ही पूर्वी कधीतरी आपले पूर्वज करत असलेल्या कामावरून पडली आहेत. मग पूर्वज करत असलेल्या कामावरून आताच्या आधुनिक काळात अभिमान किंवा लाज, स्वत:बद्दल गर्व आणि इतरांबद्दल तुच्छता बाळगण्यात काय अर्थ आहे?

आपल्या समाजाच्या सर्वच थरांत जात इतकी मुरली आहे, की बस्स! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत ‘जात’ हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं काम असतं, त्याच्या नावाची पाटी वाचली आणि तो जर नावावरून आपल्यापैकीच्या जातीचा वाटला, तर ‘कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर मिळणार’ अशी आशा निर्माण होते. अर्थात सरकारी कामं नियम आणि ‘काय(तरी)द्या’नं होत असल्यामुळे, प्रत्येक जात कामास येतेच असं नव्हे. पण आपला कॉन्फिडन्स वाढतो किंवा जातभिन्नत्वामुळे कमी होतो हे नक्की.

आपल्या देशातली आडनावं हे जात ओळखण्याचं आधार कार्ड आहे असं माझं मत आहे. आडनाव सांगितलं, की समोरच्याच्या चेहेऱ्यावरचे बदललेले सूक्ष्म भाव, आपुलकीचे किंवा उच्च/नीचतेचे, बरंच काही सांगून जातात. स्वत:च्या जातीसहित इतर कोणत्याही जातीला नाकारणारे नरपुंगव जर आपल्या देशात खरोखरच असते, तर मग जातीच्या नावाखाली लाखो लोकांची सम्मेलनं, निदर्शनं, मोर्चे यशस्वी होताना दिसले नसते. पण तसं होताना दिसतं. सातत्याने सर्वच जातीत होताना दिसतं., याचा अर्थ जात कोणालाच सोडायची नाही असाच होतो माझ्या मते. आडनावं पाहून आपल्याला त्या त्या विवक्षित जातीच्या कार्यक्रमाची निमंत्रणं फेसुकसारख्या माध्यमांवर येताना म्हणून तर आढळतात. तरुण, उच्च शिक्षित पिढीचा यातील सहभाग हा आश्चर्यकारक आणि म्हणून समाजाच्या दृष्टीने चिंताजनक ठरतो. तरुणांचं जातीप्रती जागृत असणं हे आरक्षणाशी निगडीत आहे हे नक्की. आरक्षणही ठेवायचं आणि जाती निर्मूलनाच्या गप्पाही मारायच्या आणि या दोन्ही विरोधी गोष्टी कशा काय एकत्र जमवायच्या? ते मात्र सांगायचं नाही.

- Advertisement -

काही आडनावं एकापेक्षा अधिक जातीत सारखीच सापडतात. अशा आडनावांच्या दोन अनोळखी व्यक्ती काही कारणाणं बोलताना आढळल्या, तर अशावेळी त्या एकमेकांशी अत्यंत सावधगिरीने बोलताना आढळतात. दोन माणसं म्हणून त्या बोलतच नाहीत. समोरच्याचा जातीचा अंदाज घेत (कारण आपण जातीभेद मानत नाही ही आपली सार्वजनिक भूमिका असते ना!) संभाषण चालू राहातं, पण त्यात जान नसते. पण एकदा का कळलं, की समोरची व्यक्ती आपल्याच जातीची आहे, की मग मात्र जीवाशिवाची गाठ पडल्यासारखं वाटतं आणि मग ते दोघं मिळून ‘आपलं आडनाव इतर जातींनी ‘उचलल्यामुळं’ आपलं कोण आणि परकं कोण हे कळतच नाही हो’, असं चुकचुकत चर्चा पुढे रंगते. पण तेच जर आडनाव सारखं परंतु जात भिन्न असेल, तर मात्र ते संभाषण वेगळ्या पद्धतीनं होतं हे अनुभवणं माझ्याही वाटेला अनेकदा आलेलं आहे.

माझं काही कामानिमित्त अनेकांच्या घरी जाणं होतं. मला काही माणसं अशीही भेटतात जी जातीच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. काही वेळा अशांच्या घरी जाणं झालं, तर घरच्या ज्या सदस्यांच्या परिचयाने मी त्यांच्या घरी गेलेलो असतो, ते त्यांच्या घरच्यांशी माझा परिचय करून देतात. या प्रसंगी सर्वांचीच नसली, तरी माझं आडनांव ऐकल्यानंतरची काही सदस्यांची देहबोली ही पुरेशी सूचक असते. शब्दांपेक्षा देहच जास्त बोलतो अशावेळी. अभावाने, परंतु हा अनुभव येतो हे नक्की. असाच एकदा मी माझ्या ऑफिसच्या वरिष्ठांच्या घरी गेलो असता, त्यांच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाने, “बाबा, हे xxx आहेत का?” असं विचारलेलं मी माझ्या कानाने ऐकलं आहे. खूप वाईट वाटलं तेव्हा मला, पण एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं, की लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात.

- Advertisement -

बऱ्याच जणांना आपल्या आडनावांचा विविध कारणांनी मोठा अभिमान असतो. उठसूट तो ते दाखवायलाही कमी करत नाहीत. ‘आमचं हे घराणं आणि ते घराणं’ हे सांगायची एकही संधी अशी लोकं दवडत नाहीत. खरं तर हे आडनांव अनेक पिढ्यांपूर्वी कुणातरीमुळे आपल्याला मिळालेलं असतं. पण त्यांना आपल्या आडनावांचा कोण अभिमान? आणि इतरांविषयी तुच्छता वाटतानाही दिसते. असा अभिमान बाळगताना आपण नेमकं कसं वागतोय? याचंही त्यांना भान नसतं. तर काही जणांना आपलं आडनांव नकोसं झालेलं असतं. जातीच्या आधाराने शिक्षण घेऊन आणि पुढे चांगली सरकारी नोकरी मिळवून अनेक जण पुढे गेलेत. हे चांगलं किंवा कसं हा इथे मुद्दा नाही. पण पुढे जाऊन अशांची भौतिक भरभराट झाली, की मग त्यांना आपल्या आडनावांची लाज वाटू लागते आणि मग असे काही जण त्यांना शोभेल/आवडेल अशी आडनावं घेतानाही दिसतात.

आडनावं आपली जात चटकन सांगतात. आपलं एखादं आडनाव असणं यात आपलं कर्तृत्व वा आपल्याला लाज वाटण्यासारखं काय असतं? हेच कळत नाही. आडनाव पिढीजात चालतं आलं, पडलं, दिलं, मिळालं, रूढ झालं, घडलं, घेतलं, धारण केलं किंवा सोडलं, त्याग केला किंवा पुसून टाकलं याच पद्धतीनं प्राप्त होतं किंवा जातं. बहुसंख्य आडनावं ही पूर्वी कधीतरी आपले पूर्वज करत असलेल्या कामावरून पडली आहेत. पुढे कामाचं स्वरूप बदललं तरी आडनावं मात्र कायम राहिली आणि ते मग जातवाचक निदर्शक झालं. पण पूर्वज करत असलेल्या कामावरून आताच्या आधुनिक काळात अभिमान किंवा लाज, स्वत:बद्दल गर्व आणि इतरांबद्दल तुच्छता बाळगण्यात काय अर्थ आहे? उदा. माझं स्वत:चं आडनाव महाराष्ट्रावर राज्य करून घेलेल्या चालुक्य सम्राटांवरून आलंय असं इतिहास सांगतो. परंतु माझं काहीच कर्तृत्व नसताना मी जर त्याच्या आडनावांची महती इतरांना सागून बडेजाव करू लागलो किंवा इतरांना माझ्यापेक्षा कमी दर्जाचं मानू लागलो, तर ते हास्यास्पदच होईल (आणि त्या मूळ चालुक्याला अपमानास्पद). असंच प्रत्येकाचं असतं याचं भान प्रत्येक व्यक्तीविशेषाने बाळगायला हवं, अन्यथा समाजात आधीच असलेली विषमता आणखी वाढते हे कुणीही सुबुद्ध नागरीक नाकारणार नाही.

आडनाव असणं ही आपली कायदेशीर अपरिहार्यता आहे. पण जर कायद्यात व्यवस्थित सुधारणा करून आडनावांची गरजच नाहीशी केली, तर जातीव्यवस्थेला काही आळा नक्की बसू शकेल. शिवशाहीत कुठे आडनावं प्रचलित असायची? म्हणजे असावित, परंतु ती फार कुणी लावत असावेत असं दिसत नाही. अष्टप्रधान मंडळात तर रामचंद्र नीलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, निराजीपंत रावजी, दत्तोजीपंत त्रिंबक, रामजी त्रिंबक आदी नावांतील दुसरा शब्द आडनावांपेक्षा वडिलांचं नाव असावं असं दिसतं. पेशवे ही पदवी/पद पुढे आडनाव झालं हेही अनेकांना माहीत असावं/नसावं. दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावं वापरत नाहीत. त्याऐवजी वडिलांचं नाव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन. गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव. अशाप्रकारे आपल्यालाही नाही का करता येणार? फेसबुकवर बरेच जण हल्ली स्वत:च्या पहिल्या नावासोबत आडनाव न लिहिता, आईचं आणि वडिलांचं नाव लिहिताना आढळतात. हे खरंच स्वागतार्ह आहे. हेच नेहमीच्या जीवनातही करता आलं, तर जाती निर्मूलनाच्या दिशेने ते एक ठोस पाऊल असेल.

– नितीन साळुंखे

https://www.facebook.com/nitin.salunke.1297


(The views and opinions expressed in this article are those of the author and do not necessarily reflect the official policy or position of MyMahanagar.com)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -