घरफिचर्सप्रतिभावान गीतकार आनंद बक्षी

प्रतिभावान गीतकार आनंद बक्षी

Subscribe

आनंद बक्षी हे एक हिंदी गीतकार व कवी होते. बक्षी यांचा जन्म 21 जुलै 1930 रोजी आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मीरी मोहयाल ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची आई सुमित्रा आनंद बक्षी ते पाच वर्षांचे असताना वारली. त्यांचे कुटुंब भारताच्या फाळणी दरम्यान २ ऑक्टोबर, १९४७ रोजी भारतात आले. डकोटा विमानातून दिल्लीला आल्यावर बक्षी कुटुंब पुणे, मेरठ आणि शेवटी परत दिल्लीत येऊन स्थायिक झाले.

कविता हा त्यांचा जीव की प्राण. त्यांचे विश्वच निराळे. शब्दांच्या मळ्यात फिरणारे. त्यात त्यांच्या वाट्याला आली लष्करातली नोकरी. लष्कराच्या कडक शिस्तीत शब्दांना अधिकच साचेबद्धता आली. ते रुक्ष वातावरण, तो युद्धाचा सराव, लष्करी कवायत अशा वातावरणात हा शब्दप्रभू कवितेच्या मळ्यात खुशाल बागडायचा. अंगच्या प्रतिभेने रुपेरी पडद्याच्या दालनात त्यांनी प्रवेश केला. त्यांनी रसिकांना जिंकले. कारण त्यांच्या शब्दांची जादूच तशी होती. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांनी तरुणाईला झिंग आणली. गायक व्हायचे आनंद बक्षींच्या मनात खूप होते. मात्र, त्यांच्यातील कविमनाने गायकीवर मात केली. ते गीतकार बनले आणि जन्माला आली तुमचे-आमचे जीवन फुलवणारी, अविस्मरणीय गाणी.

- Advertisement -

शब्दांच्या या जादुगाराने आपल्या गीतांनी रसिकांना जणू मोहिनीच घातली. प्रेमाची ओढ असो की विरह, आई-मुलातील वात्सल्य असो की मरणाची अपरिहार्यता असो, आनंद बक्षींच्या लेखणीने या सर्व भावना रसिकांच्या मनी ठसायच्या. 1958 मध्ये आलेला ‘भला आदमी’ हा गीतकार आनंद बक्षींचा पहिला चित्रपट. ‘धरती के लाल न कर इतना मलाल’ हे त्यांचे पहिले गाणे. आनंद बक्षी प्रकाशझोतात आले ते ‘जब जब फूल खिले’च्या गीतांमुळे. या चित्रपटात त्यांची लेखणी अशी खुलली की तिने रसिकांची मने काबीज केली. ‘ये समा, समा है ये प्यार का’ हे यातले लताच्या आवाजातले गाणे आजही ताजे, टवटवीत वाटते.

सहज ओठांवर येतील असे साधे, आशयघन शब्द, मनाला भावणार्‍या शब्दांची यमकालंकारात केलेली सहज-सोपी गुंफण ही आनंद बक्षींच्या गाण्यांची वैशिष्ठ्ये. रसिकांच्या मनातले भाव नेमकेपणाने त्यांच्या गीतांत उतरायचे. मैत्री असो की द्वेष, प्रेम असो की मत्सर, वासल्य असो की कारुण्य, जीवनाचे तत्त्वज्ञान असो की फँटसी, आनंद बक्षींची लेखणी हे सारे भावविश्व चपखलपणे टिपायची. या सर्व भावना मग सुंदर गीतातून रसिकांच्या मनात रुंजी घालायच्या. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याबरोबर आनंद बक्षी यांचे सूर जुळले.

- Advertisement -

या त्रयीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. आने से उसके आये बहार (जीने की राह), बिंदिया चमकेगी (दो रास्ते), सावन का महीना (मिलन), मैं शायर तो नहीं (बॉबी), परदा है परदा (अमर अकबर अँथोनी), आदमी मुसाफिर है (अपनापन), डफलीवाले (सरगम), ओम शांती ओम (कर्ज) ही आनंद बक्षी-लक्ष्मी-प्यारे या त्रयींची काही सुपरहिट गाणी. लक्ष्मी-प्यारे यांच्याप्रमाणेच राहुलदेव बर्मन (आरडी) यांच्याबरोबरही आनंद बक्षी यांचे सूर जुळले. ना कोई उमंग है (कटी पतंग), रैना बीती जाए (अमर प्रेम), महेबूबा महेबूबा (शोले), परबत के पीछे (महेबूबा), सावन के झूले पडे (जुर्माना), दम मारो दम (हरे राम) ही आरडी-आनंद बक्षी यांची काही गाजलेली गाणी. कल्याणजी-आनंदजी, अन्नु मलिक, राजेश रोशन या संगीतकारांसाठीही आनंद बक्षी यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. अशा या महान गीतकाराचे 30 मार्च 2002 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -