घरफिचर्सकामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी

कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी

Subscribe

नारायण मल्हार जोशी हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक. त्यांचा जन्म ५ जून १८७९ रोजी कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे झाला. त्यांचे वडील वेदविद्यासंपन्न व प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव येथे वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. समाजसेवेच्या इच्छेने १९०९ मध्ये ते ‘भारतसेवक समाज’ या संस्थेचे सदस्य झाले. संस्थेच्या ज्ञानप्रकाश या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १९११ मध्ये त्यांनी ‘सामाजिक सेवा संघ’ (सोशल सर्व्हिस लीग) ही संस्था स्थापिली. या संस्थेच्या कार्याशी विविध नात्यांनी ते १९५५ पर्यंत निगडित होते.

१९११-१३ या काळात त्यांनी अहमदनगर, गुजरात व तत्कालीन संयुक्त प्रांत येथील दुष्काळ पीडितांसाठी साहाय्यनिधी गोळा केला. हळूहळू त्यांनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवरच केंद्रित केले आणि तत्संबंधीच्या सर्व उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील कामगारवस्त्यांमध्ये अनेक कल्याणकेंद्रे, रात्रशाळा, मोफत वाचनालये, वैद्यकीय केंद्रे, औद्योगिक प्रशिक्षणवर्ग इ. चालविले लंडनमधील टॉयन्बी हॉलच्या धर्तीवर कामगारांसाठी दोन मोठी सभागृहे बांधली. १९१७ साली भारत सरकारतर्फे मेसोपोटेमियाला भेट देणार्‍या पत्रकार प्रतिनिधी मंडळाचे ते एक सदस्य होते. १९२१ साली त्यांनी कामगार समाचारनामक एक मराठी साप्ताहिक सुरू केले.

- Advertisement -

जोशींनी ३१ ऑक्टोबर १९२० साली ‘आखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यास मदत केली. १९२९ पर्यंत ते तिचे कार्यवाही होते. त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी नंतर ‘इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ अशी निराळी संघटना काढली. पुढे १९३३ मध्ये ही संघटना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर’ ह्या संघटनेत सामावण्यात येऊन नवीन संघटनेचे ‘नॅशनल ट्रेड्स युनियन फेडरेशन’ असे नाव ठेवण्यात आले. याशिवाय जोशी अनेक कामगार संघटनांशी निगडित होते. १९२६ मध्ये त्यांनी ‘टेक्स्टाइल लेबर युनियन’ ही कापडगिरणी कामगारांची संघटना स्थापिली तिचे ते अध्यक्षही होते.

वॉशिंग्टन येथे १९१९ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भारतीय कामगारवर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची भारत सरकारने नियुक्ती केली. अशा परिषदांच्या निमित्ताने १९२२-४८ या काळात जोशींनी सोळा वेळा युरोपीय देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले. अनेक कामगार कल्याणविषयक कायद्यांना मूर्त रूप देण्याचे श्रेय जोशींनाच आहे. कारखाना अधिनियम (१८८१), कामगार हानिपूर्ती अधिनियम (१९२४), भारतीय कामगार संघटना अधिनियम (१९२६), वेतन प्रदान अधिनियम (१९३६), बालकामगार रोजगारी अधिनियम (१९३८) इ. अधिनियमांमध्ये जोशींच्या सतत प्रयत्नांमुळे कामगारानुकूल अशा अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. अशा या महान समाजसेवकाचे ३० मे १९५५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -