घरफिचर्सकामगारनेते जॉर्ज फर्नांडिस

कामगारनेते जॉर्ज फर्नांडिस

Subscribe

कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खासगी विमा कंपनीत अधिकारी होते.

सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात होती. १९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. त्यावेळी सुरुवातीचे त्यांचे दिवस फार खडतर होते. पण त्यांची चिकाटी यावेळी उपयोगी पडली.

- Advertisement -

जॉर्ज फर्नांडिस यांनी सर्वप्रथम १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का.पाटील यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र, १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी १९७४ मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम बघितले.

जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसर्‍या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. १९८४ च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. पण १९८९ मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले. विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.

- Advertisement -

१९९४ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. २००१ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मार्च ते ऑक्टोबर २००१ या काळात ते मंत्रिमंडळाबाहेर होते. पण ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली. अशा या महान कामगार नेत्याचे २९ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -