घरफिचर्सजालियनवाला बाग हत्याकांड

जालियनवाला बाग हत्याकांड

Subscribe

१३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडले. अमृतसर हे अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्वाचे शहर होते. ज्यांच्यावर तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला होता ते सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणीसाठी, 1० एप्रिल १९१९ रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे निघाला होता. ह्या घोळक्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार्‍या इमारतींना आगी लावण्यात आल्या. टाऊन हॉल, दोन बँकांच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम वगैरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गुरखा रेजिमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाच्या एका युरोपियन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपियन नागरिकाचा रस्त्यात खून करण्यात आला.

एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८ ते २० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतरचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी इमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपियन नागरिक ठार मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. योगायोग असा की १३ एप्रिलला पंजाबी जनतेचा प्रिय सण ‘बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख जनता सण साजरा करण्यास एकत्र जमले. त्यासाठी मोठा जनसमुदाय जालियानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉमुळे जमावबंदी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता. १३ एप्रिल या दिवशी जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले.

- Advertisement -

जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निःशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठून असहाय्य अवस्थेत टिपून मारण्यात आले. या नरसंहाराबद्दल कुणाला ना खेद ना खंत. डायरने तर उद्दामपणे विधान केले की ’त्याला याबद्दल कसलाही खेद होत नाही, गोळ्या संपल्यामुळे त्याचा नाईलाज झाला अन्यथा आणखी माणसे मारण्याने त्याला फरक पडत नव्हता.’ आपल्या विरुद्ध डोके वर काढणार्‍याला काय शासन होते हे दाखवून देण्यासाठी हे भयानक कृत्य इंग्रज सरकारच्या अधिकार्‍यांनी केले. जवळपास दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर हुतात्मा उधमसिंह यांनी इंग्लंडमध्ये जाऊन १३ मार्च १९४० या दिवशी ज्याने जालियानवाला बागेतील हत्याकांड योग्य असल्याचे शिफारसपत्र दिले होते, त्या पंजाबच्या लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडायरवर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याचा वध केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -