घरफिचर्सविचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

Subscribe

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. त्यांचा आज स्मृतीदिन. (२७ जानेवारी १९०१- २७ मे १९९४) धुळे जिल्हातील पिंपळनेर येथे जन्म त्याचा जन्म झाला. वडिलांचे नाव बाळाजी आणि आईचे चंद्रभागा. त्यांचे वडील बंधू वेणीमाधवशास्त्री आयुर्वेदाचार्य म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे केवलाचंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. 1923 साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली. इंग्लिश भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांच्या स्वप्रयत्नाने त्यांनी सखोल व्यासंग केला. 1927 मध्ये मुल्हेरच्या (नासिक जिल्हा) पंडित घराण्यातील सत्यवती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली असून त्यांचे जेष्ठ चिरंजीव मधुकर हे अमेरिकेत गणकयंत्रनिर्मिती करणार्‍या ‘इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स’ ह्या उद्योगसंस्थेत संशोधन व्यवस्थापक ह्या पदावर आहेत.

प्राज्ञ पाठशाळेचे वातावरण सनातनी पढिक पांडित्याचे नव्हते ते पुरोगामी चिकित्सेचे व राष्ट्रीय स्वरूपाचे होते. परिणामतः राष्ट्रीय व सामाजिक आंदोलनांत भाग घेण्याची प्रेरणा या वातावरणातून शास्त्रीजींना लाभली. म. गांधींच्या अस्पृश्यता निवारणकार्यास शास्त्रीजींनी हिंदुधर्मशास्त्राचे पूरक भाष्य तयार करून दिले.
तर्कतीर्थांच्या नेतृत्वाने प्राज्ञ पाठशाळेला एका व्यापक सांस्कृतिक कार्यकेंद्राचे स्वरूप लाभले. वाईमध्ये हरिजन विद्यार्थ्यांचे वसतिगृह, हातबनावटीचा कागद कारखाना, अद्ययावत मुद्रणालय इ. उपक्रम त्यांनी यशस्वीपणे अंमलात आणले. वाईच्या महाविद्यालयाचेही ते संस्थापक-सदस्य आहेत. प्राज्ञ पाठशाळेतर्फे धर्मकोशाच्या संपादनाचे मौलिक कार्य त्यांनी हाती घेतले. या कोशाचे 11 खंड प्रसिद्ध झाले असून त्यांत कुटुंबसंस्था, हिंदुसंस्कार, जाती, विवाह, मालमत्ता याचप्रमाणे हिंदुधर्मविधी, नीतीशास्त्र व तत्त्वज्ञान इ. विषयांसंबंधी प्राचीन शास्त्रांतील ग्रांथिक माहिती व्यवस्थितपणे संकलित केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे सुरुवातीपासून म्हणजे 1960 पासून शास्त्रीजी अध्यक्ष होते. मंडळातर्फे भाषा-साहित्यविषयक अनेक योजना कार्यन्वित झालेल्या आहेत. त्यांपैकी प्रमुख प्रकल्प वीस खंडीय मराठी विश्वकोशाचा आहे. प्राचीन-अर्वाचीन सर्व ज्ञानविज्ञाने मराठीतून विशद करण्याचे हे मौलिक कार्य शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाखाली झाले.

- Advertisement -

शास्त्रीजींनी व्याख्याने, परिषदा इ. निमित्ताने भारतभर प्रवास केला. अमेरिका, ब्रह्मदेश, रशिया तसेच यूरोपीय, आशियाई आणि आफ्रिकी देशांनाही त्यांनी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून किंवा स्वतंत्रपणे निमंत्रित म्हणूनही भेटी दिल्या आहेत. सोरटी सोमनाथाच्या जीर्णोद्धाराचे मुख्य पौरोहित्य त्यांनीच केले (1951). कुकुरमुंडे येथील सनातन धर्मपरिषद (1925) व वाराणसीचे अखिल भारतीय संस्कृत पंडितांचे संमेलन (1929) यांत भाग घेऊन शास्त्रीजींनी धर्मसुधारणेचे सभाष्य समर्थन केले. भारतीय संविधान संहितेचे संस्कृत भाषांतरही त्यांनी केले. हिंदी राष्ट्रभाषेच्या प्रचारकार्याशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (1954). याखेरीज अनेक विभागीय व प्रादेशिक मराठी साहित्य संमेलनांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषविली. शास्त्रीजींचे २७ मे १९९४ रोजी निधन झाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -