घरफिचर्समहाराष्ट्रीय विदुषी पंडिता रमाबाई

महाराष्ट्रीय विदुषी पंडिता रमाबाई

Subscribe

लक्ष्मीबाईंस व रमाबाईंस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. तसेच रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले.

पंडिता रमाबाई यांचा आज स्मृतिदिन. पंडिता रमाबाई म्हणजे स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. त्यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी म्हैसूर संस्थानातील मंगलोरजवळ माळहेरंजी येथे राहणार्‍या अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे या चित्पावन ब्राह्मण दाम्पत्यापोटी झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस व रमाबाईंस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. तसेच रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या १५-१६ वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले.

रमाबाईंनी संस्कृतमध्ये तर प्रावीण्य मिळविले होतेोच; पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. १८७८ साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ ह्या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणार्‍या रमाबाई ह्या आज एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले. बाल-विवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ ची स्थापना केली. स्त्रीधर्मनीति (१८८२) हे पुस्तक त्यांनी याच साली लिहिले. १८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीति ह्या पुस्तकाच्या विक्रीतून केला.

- Advertisement -

रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणेच काळाच्या पुढे होत्या. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी, संस्कृत यांबरोबरच तुळू आणि हिब्रू ह्या भाषाही अवगत होत्या. अत्यंत बुद्धिवान असलेल्या या महिलेचे अंतःकरण अत्यंत उदार व दीनदुबळ्या स्त्रियांकरिता सतत तळमळणारे होते. वैयक्तिक दुःखाची किंवा अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला; म्हणजे भूतदयेचे प्रतीक असलेला येशू ख्रिस्त स्वीकारला; दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले; पण कुठलाही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही. त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या; पण त्यांनी हिंदू समाज व संस्कृती मात्र सोडली नाही. शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या; त्यांनी सतत खादी वापरली व आश्रमवासींनाही ती वापरावयास लावली. स्त्रियांच्या उद्धाराकरिता त्यांनी आजन्म व अथकपणे केलेले प्रयत्न त्यांच्या समर्मित जीवनाचेच एक अंग होते. ज्या व्यक्तिंनी आपल्या सेवेने भारताची प्रतिष्ठा वाढविली त्यांमध्ये रमाबाईंचे स्थान वैशिष्ठ्यपूर्ण आहे. अशा या महान विदुषीचे ५ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -