घरफिचर्समुक्त छंदाचे प्रवर्तक कवी अनिल

मुक्त छंदाचे प्रवर्तक कवी अनिल

Subscribe

प्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ अनिल यांचा आज स्मृतिदिन. कवी अनिल यांचे मराठी कवितेच्या वाटचालीप्रमाणेच अपारंपरिक शिक्षणक्षेत्रातही भरीव योगदान आहे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी विदर्भातील मूर्तिजापूर येथे झाला. शालेय शिक्षण अमरावती येथील हिंदू हायस्कूलमधून झाले. ते 1919 साली पुण्यात आले. वर्‍हाडात पांढरपेशा समाजामध्ये शिक्षणासाठी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेण्याची चढाओढ असे. अनिल यांनी मॅट्रिकची परीक्षा अलाहाबाद येथून उत्तीर्ण केली होती.

ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुण्याहून बीए (1924) झाले. पुढे, त्यांनी कायदे शिक्षणाचे धडे घेतले. ते एलएलबी 1925 साली झाले आणि त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली. त्यातूनच त्यांना होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथे न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाली. अनिल यांच्या आवडीचे विषय पुरातत्त्व, शिल्प, संगीत आणि तत्त्वज्ञान हे होते. मध्यंतरीच्या काळात, त्यांनी कोलकाता येथील शांतिनिकेतनात नंदलाल बोस यांच्याकडे भारतीय चित्रकलेचाही अभ्यास केला.

- Advertisement -

अनिल यांच्या काव्यलेखनास 1930 साली प्रारंभ झाला. त्यांचा ‘फुलवात’ हा पहिला कवितासंग्रह 1932 साली प्रसिद्ध झाला. ‘फुलवात’ने मराठी साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा ‘रविकिरण मंडळा’तील कवींचा बोलबाला मराठीत विशेषत्वाने होता. त्यांच्या कवितेमध्ये पांडित्यपूर्ण, संस्कृतप्रचुर शब्दकळा, प्रसंगोपातता, शब्दालंकार, यमकादी बंधने यांवर कठोर कटाक्ष असे. त्या पार्श्वभूमीवर अनिल यांचा ‘फुलवात’ हा संग्रह ‘हृदयी लावियली फुलवात’ अशा हळुवार ओळी घेऊन बाहेर आला. त्या कवितेचे वेगळेपण आणि वैशिष्ठ्य साधी, सरळ व भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे ठरले. त्यानंतर तीन वर्षांनी अनिल यांची ‘प्रेम आणि जीवन’ ही कविता रसिकांपुढे आली.

अनिल यांनी मालवण येथे झालेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद 1958 साली भूषवले होते. त्यांनी कवितेत रचनेच्या अंगानेही प्रयोग केले. ते ‘दशपदी’ आणि ‘मुक्तछंद’ या काव्यप्रकारांचे प्रवर्तक होते. त्यांनी कविता मुक्तछंदात असली तरी कवितेचे व्याकरण आणि तालाचे भान सोडले नाही. त्यांच्या ‘दशपदी’त दहा चरणांची कविता असे. त्यांना ‘दशपदी’साठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार 1977 साली मिळाला होता. अनिल यांना 1979 ची ‘साहित्य अकादमी’ची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.

- Advertisement -

अनिल आणि कुसुमावती या सुविद्य दाम्पत्याच्या पत्रव्यवहाराचा संग्रह (कुसुमानिल) प्रसिद्ध आहे. महाविद्यालयीन तरुणांची प्रेमपत्रे, त्यांच्या तत्कालीन भावना, घरचा विरोध आणि त्याला न जुमानता वर उसळी मारून येणारी भावोत्कट प्रेमवृत्ती यांचे तरल व काव्यपूर्ण शब्दांतील चित्रण म्हणून सामाजिक दस्तऐवज या दृष्टीने ती पत्रे महत्त्वपूर्ण वाटतात. ह.वि. मोटे प्रकाशनाने त्यांच्या व अनिल यांच्या अशा निवडकपत्रांचा संग्रह ‘कुसुमानिल’ शीर्षकाने प्रथम 1972 साली प्रकाशित केला.

ते पुस्तक ‘मराठी अस्मिता’ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशित करण्यात आले. नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते त्या पत्रप्रपंचाचे पुनर्प्रकाशन नागपूर येथे 2 जुलै 2017 रोजी झाले. एलकुंचवार यांची त्या संग्रहास प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे – ती पत्रे 1922 ते 1927 या काळातील आहेत. पत्रातून माणूस जितका खरेपणाने कळतो तितका तो आत्मचरित्रातून किंवा चरित्रातूनही कळत नाही. अशा या महान कवीचे 8 मे 1982 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -