घरफिचर्सआंबेडकरवादी लेखक बाबुराव बागुल

आंबेडकरवादी लेखक बाबुराव बागुल

Subscribe

बाबुराव बागुल हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोहीभाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. त्यांचा जन्म 17 जुलै 1930 रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाला. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कँपात राहणार्‍या मावशीकडे पाठवून दिले.

तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.

- Advertisement -

1955 मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली. 1957 मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणार्‍या त्यांच्या कथा 1963 साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर 1969 सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला.

‘अघोरी’, ‘कोंडी’, ‘पावशा’, ‘सरदार’, ‘भूमिहीन’, ‘मूकनायक’, ‘अपूर्वा’ अशा कथा-कादंबर्‍यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबर्‍या या गावकुसाबाहेर राहणार्‍या समाजाच्या सामाजिक जाणिवांचे व वेदनांचे वर्णन करणार्‍या आहेत. स्त्रीप्रधान कथालेखन हादेखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. सूड कथेमध्ये बाबुराव बागूल यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे चित्रण केले आहे. या कथेतील स्त्री पात्र हे समाजातील स्त्रियांच्या शोषित पीडित स्त्रीच्या सामाजिक स्थितीचे चित्रण करणारे आहे.२६ मार्च 2008 रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -