घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशेअर बाजारात रिस्क हैं, तो इष्क हैं...

शेअर बाजारात रिस्क हैं, तो इष्क हैं…

Subscribe

२०२१ हे वर्ष शेअर बाजाराला ‘कभी खुशी, कभी गम’ अशा स्वरुपाचे गेले. या वर्षी गुंतवणूकदारांनी जोखीम पेलली. कारण कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे त्यातून मार्ग म्हणून गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोखीम जास्त पेलली, परिणामी त्यांना परतावाही जास्त मिळाला. जास्त जोखीम, जास्त परतावा हे शेअर बाजारच ब्रीद आहे. ‘रिस्क है तो, इष्क है’ ही शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची धारणा असते. गेल्या वर्षीच्या चलनवाढीचा विचार करता, मुदत ठेवीत गुंतवणूक असणार्‍यांना गेल्या वर्षी ‘निगेटिव्ह’ परतावा मिळाला होता. सोन्यानेही गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना हात दिला नाही. पण ओमायक्रॉन अधिक वाढला नाही तर अच्छे दिनची आशा बाळगायला हरकत नाही.

जानेवारी ते डिसेंबर हे शेअर बाजारचे वर्ष नव्हे. एप्रिल ते मार्च हेदेखील शेअर बाजाराचे वर्ष नाही. शेअर बाजाराचे वर्ष हे संवत्सर ते संवत्सर असते. म्हणजे दिवाळीचा पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा) ते पुढच्या वर्षीचे लक्ष्मीपूजन म्हणजे आश्विन अमावस्या. हा संवत्सराचा कालावधी असतो व हाच कालावधी शेअर बाजारचे वर्ष असते. दर वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या थाटामाटात नवीन वर्षाचे मुहुर्ताचे सौदे करून, शेअर बाजार नव्या वर्षाची सुरुवात करतो तरीही शेअर बाजारला कॅलेंडर वर्ष कसे गेले? हा देखील गुंतवणूकदारांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. कित्येक व्यापारीही आपले वर्ष संवत्सराप्रमाणेच पाळतात!

२०२१ हे वर्ष शेअर बाजाराला ‘कभी खुशी, कभी गम’ अशा स्वरुपाचे गेले. या वर्षी गुंतवणूकदारांनी जोखीम पेलली. कारण कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे त्यातून मार्ग म्हणून गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोखीम जास्त पेलली, परिणामी त्यांना परतावाही जास्त मिळाला. जास्त जोखीम, जास्त परतावा हे शेअर बाजारच ब्रीद आहे. ‘रिस्क है तो, इष्क है’ ही शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची धारणा असते. गेल्या वर्षीच्या चलनवाढीचा विचार करता, मुदत ठेवीत गुंतवणूक असणार्‍यांना गेल्या वर्षी ‘निगेटिव्ह’ परतावा मिळाला होता. सोन्यानेही गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना हात दिला नाही.

- Advertisement -

सार्वजनिक उद्योगातील बँका, कंपन्या व बांधकाम उद्योगातील कंपन्या यांचे भाव चढे होते. २०२१ मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक वाढली. परिणामी डिमॅट खाती उघडणार्‍यांचे प्रमाणही वाढले. जानेवारी २०२१ मध्ये डिमॅट खात्यांचे प्रमाण जे १७ लाख होते ते वाढून ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३५ लाख इतके झाले. ३१ डिसेंबर २०२० रोजी मुंबई शेअर बाजार निर्देशांक ४७७५१ अंशांवर बंद झाला होता. तर सोमवार २० डिसेंबर रोजी तो ५८२८३.४२ अंशांवर बंद झाला होता. गेल्या एका वर्षाच्या तुलनेत शेअर बाजार निर्देशांकात १०५३२.४२ अंशांची वाढ झालेली आहे.

कोरोना जोशात असताना २३ मार्च २०२० रोजी मुंबई शेअर बाजार निर्देशांक प्रचंड कोलमडून २५९८१ अंशांवर बंद झाला होता. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई शेअर बाजार निर्देशांक ६१७६६ अंशांवर बंद झाला होता. बँकांतील मुदत ठेवींवर वर्षाला मिळणार्‍या ५ टक्के व्याजाच्या तुलनेत, शेअर बाजारने गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला. २०२१ मध्ये भांडवली बाजारपेठेत ‘आयपीओ’ ही फार मोठ्या प्रमाणावर आले व या कंपन्यांचे ‘लिस्टिंग’ झाल्यामुळे, शेअर बाजारातील ट्रेडिंगचे प्रमाणही वाढले.

- Advertisement -

कमी भांडवल असणार्‍या कंपन्यांची ही कामगिरी २०२१ मध्ये चांगली झाली. यांच्या कामगिरीत ५७ टक्के झाली. २०२० या वर्षी ३२ टक्के वाढ होती म्हणजे तुलनात्मकदृष्ठ्या २०२१ मध्ये २५ टक्के अधिक वाढ झाली. यात हैदराबाद येथील ब्राईट कॉम या कंपनीने २०२१ मध्ये गुंतवणूकदारांना २७६६ टक्के परतावा दिला. टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र कंपनीने २२८९ टक्के, ‘जीआरएम’ ओव्हरसिंग कंपनीने १२१९ टक्के, ओरम प्रोपटेक या कंपनीने ८४१ टक्के तर रतन इंडिया एन्टरप्राईसेस या कंपनीने ७१९ टक्के असे भरघोस परतावे दिले.

सारेगम आणि टिप इंडस्ट्रिज या दोन कंपन्यांनी प्रत्येकी ४९६ टक्के व ४०१ टक्के परतावा दिला. २००० पर्यंत या कंपन्या म्युझिक कॅसेट उत्पादित करीत, पण तांत्रिक प्रगतीत कॅसेट कालबाह्य झाल्यामुळे आता या कंपन्या डिजिटल रेडिओ व सिनेमा यांची निर्मिती करतात. इंडियन रेल्वेज कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या कंपनीच्या शेअरचे बाजारी मूल्य ३१ डिसेंबर २०२० रोजी जे २८८ रुपये होते ते वाढून १८ ऑक्टोबर २०२१ रोजी ११७६ रुपये झाले. या शेअरने गुंतवणूकदारांना ३०८ टक्के परतावा दिला.

स्टेट बँकेच्या शेअरच्या बाजारी मूल्यात २०२१ मध्ये ७० टक्के वाढ झाली. इंडियन ओव्हरसिज बँकेच्या शेअरच्या बाजारी मूल्यात ९३ टक्के वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँकांच्या शेअरनीही चांगली कामगिरी केली. न्यू जनरेशन खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या शेअरला मात्र मागणी कमी होती. या बँकेच्या शेअरच्या बाजारी मूल्यात फक्त ३६ टक्के वाढ झाली. एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक यांच्या भागधारकांना २०२१ मध्ये चांगला परतावा मिळू शकला नाही. या अगोदरच्या वर्षी या बँकांची कामगिरी चांगली होती.

निफ्टी रिअल्टी इंडेक्सने गुंतवणूकदारांकडे 52 टक्के परतावा दिला. निफ्टी मेटल इंडेक्सने आजपर्यंत 68 टक्के परतावा दिला आहे. जास्त जोखीम, जास्त परतावा हे जरी शेअर बाजारचे ब्रीद वाक्य असले तरी ते नेहमीच यशस्वी होईलच असे नाही. जास्त जोखमीने नुकसान झाल्याची उदाहरणेही भरपूर आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांची अशी मनोवृत्ती असते की, ते सुरुवातीला गुंतवणूक करायचे धाडस करीत नाहीत, सुरुवातीस गुंतवणूक करण्यास कचरतात. पण शेअर जर वर जातो आहे असे दिसले की ते गुंतवणूक करतात. एका अर्थी अशी सावधानता बाळगणे बरोबर आहे.

डिसेंबर 2019 पासून डिसेंबर 2020 या कालावधित डिमॅट खाती 26 टक्क्यांनी वाढली. डिसेंबर 2019 मध्ये असलेली ३ कोटी ९४ लाख खाती वाढून डिसेंबर मध्ये 4 कोटी 98 लाख खाती झाली. डिसेंबर 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधित डिमॅट खात्यात 48 टक्के वाढ होऊन खात्यांचे प्रमाण 7 कोटी 38 लाख इतके झाले. फक्त फेब्रुवारी 2021 मध्ये 17 लाख नवी डिमॅट खाती उघडली गेली. ऑक्टोबरपर्यंत 35 लाख खाती उघडली गेली.

आता एखाद्या भागधारकाला जर फायदा मिळविण्यासाठी किंवा काही कारणासाठी शेअर विकायचे असतील तर त्याचे डिमॅट खाते असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये शेअर बाजारने कमाल पातळी गाठली होती. शेअर बाजार जेवढा वर जातो तेवढी किरकोळ गुंतवणूकदारांची शेअर बाजारात गुंतवणूक वाढते. ज्या गुंतवणूकदारांनी 2021 मध्ये शेअर बाजार कमाल वर असताना गुंतवणूक केली त्यांना आता नुकसानीचा फटका बसत असेल. पण जे अगोदरपासून शेअर बाजारात होते त्यांनी शेअर बाजारने कमाल पातळी गाठल्यावर जर विक्री केली असेल अशांनी भरपूर नफा कमविला असेल.

गुंतवणुकीच्या बाबतीत एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नका. हे तत्व कधीही विसरू नका. संपूर्ण गुंतवणूक शेअर बाजारात करू नका. गुंतवणुकीसाठी इतर पर्यायही निवडा. जास्त परताव्याच्या आमिषाने तोंडघशी पडू नका. मुंबई शेअर बाजारच्या ‘प्राईस -टू-अर्विंग्ज’ रेपोचे प्रमाण सध्या 26.76 टक्के आहे. 2020 अखेरीच्या तुलनेत हे प्रमाण फार कमी आहे. 2020 मध्ये मुंबई शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे 23 बिलियन युएस गुंतवणूक केली होती. कारण 2020 मध्ये पाश्चिमात्य देशांत गुंतवणुकीवर मिळणार्‍या व्याजाचे प्रमाण कमी होते. भारतात गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल या कारणाने भारतात परदेशी गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणावर आली होती. 2021 मध्ये कोरोनाने जगातल्या सर्व अर्थव्यवस्था उलट्याच्या सुलट्या करून टाकल्या होत्या. भारत मात्र कोरोनातून लवकर सावरत आहे. ओमायक्रॉनची पिडा मात्र भारताला न छळो ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.

2021 मध्ये शेअर बाजारात 4.5 बिलियन युएस डॉलर इतकीच गुंतवणूक आली. ऑक्टोबरमध्ये जेव्हा शेअर बाजारने कमाल उसळी घेतली होती तेव्हा तसेच नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये शेअर बाजारात असलेली परदेशी गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणावर काढून घेण्यात आली. त्यामुळे 18 ऑक्टोबर 2021 रोजी शेअर बाजार निर्देशांकाने जी कमाल पातळी गाठली होती त्यात नंतर 7.7 टक्के घट झाली. फेडरल रिझर्व्ह ऑफ दी युनायटेड स्टेटस व दि अमेरिका सेन्ट्रल बँक यांनी मार्च 2020 पर्यंत नोटा न छापण्याचा निर्णय घेतला आहे व त्यानंतर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दि बँक ऑफ इंग्लंडने यापूर्वीच व्याजदर वाढविले आहेत. हे असेच सुरू राहिल्यास 2022 मध्ये भारतातील शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक येण्याचे प्रमाण कमी असेल. 2022 मध्ये प्राथमिक भांडवली बाजारपेठेची घोडदौड मात्र चालूच असेल. कारण बरेच ‘आयपीओ’ 2022 मध्ये भांडवली बाजारपेठेत धडकणार आहेत.

2021 मध्ये विक्रीस आलेल्या ‘आयपीओ’ पैकी सर्व ‘आयपीओ’ विक्री मूल्याहून जास्त रकमेत लिस्ट झाले नाहीत. बरेच ‘आयपीओ’कमी किमतीस ‘लिस्ट’ झाले. ‘पेटीएम’चा शेअर तर लिस्टींगच्या वेळी इतका कोलमडला की त्याचे शेअर बाजारात काही दिवस गंभीर परिणाम जाणवत होते. त्यामुळे कित्येक गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार असा सल्ला देतात की, ‘आयपीओ’त गुंतवणूक करण्यापेक्षा सदर शेअर ‘लिस्ट’ झाल्यावर शेअर बाजारात विकत घ्या, त्यावेळी गुंतवणूकदाराला त्या शेअरचे खरे मूल्यांकन समजलेले असते. 2021 मध्ये शेअर बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदार जास्त सक्रिय होते. या वर्षीच्या मुहूर्तांच्या सौद्याच्या दिवशीही शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते.

2022 मध्ये समजा परदेशी गुंतवणूक रोडावली तर भारतीय गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याची रिस्क घेतील का? हा कळीचा मुद्दा आहे. आता डिसेंबर संपत आला आहे. जानेवारी 2022 संपल्यानंतर लगेच फेब्रुवारीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत 2022-2023 या वर्षाचा अर्थसंकल्प (बजेट) सादर करणार. हे बजेट कसे असावे याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मागण्या पुढे येत आहेत. या अर्थसंकल्पात काय प्रस्तावित असेल यानुसार भारतीय अर्थव्यवस्था तसेच शेअर बाजार आकार घेईल. पण जर तो नवा ओमायक्रॉन विषाणू फार मोठ्या प्रमाणावर आला नाही, कोरोनाही बराचसा कमी झाला व आकस्मिक काही संकट देशावर आले नाही, तर 2022 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसह शेअर बाजारालाही चांगले असेल, हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -