घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजपच्या रणनीतीत फसलेल्या ममता!

भाजपच्या रणनीतीत फसलेल्या ममता!

Subscribe

एकतर सत्तेत आल्यापासून ममतांनी आपले सगळे लक्ष पुरोगामी भूमिकेतून मुस्लिमांच्या लांगुलचालनावर केंद्रित केले. दुसरीकडे आपल्या पक्षांच्या गुंडांकरवी भाजपला मारून संपवण्याचा खेळ आरंभला. परिणामी बंगालमध्ये हिंदू भाजपकडे एकवटत गेला आणि गुंडगिरीने गांजलेला मतदारही भाजपाच्या गोटात जमा होत गेला. सर्वात कहर म्हणजे भाजपच्या हिंदुत्वाला शह देण्यासाठी ममतांनी हिंदू सण समारंभांनाही प्रतिबंध घालण्यापर्यंत मजल मारली. दुर्गापूजा हा तिथला सर्वात मोठा सार्वजनिक हिंदू उत्सव; त्यालाही चाप लावण्याचे ममतांचे सरकारी फतवे कोर्टात टिकले नाहीतच. पण त्यांना कोर्टात आव्हान देणारा भाजपा हिंदू मतदारांसाठी ‘आपला पक्ष’ होण्याला हातभार लागला.

निवडणुकांचे राजकारण आणि युद्धक्षेत्र यात फार मोठा फरक नसतो. रणनीतीमध्ये शत्रू त्याच्या शक्ती व बळावरच विसंबून नसतो तर तुमच्याकडून त्याला ठराविक प्रतिसाद अपेक्षित असतो. तुम्ही त्याच्या अपेक्षेप्रमाणे वागणे वा प्रतिसाद देण्यालाही, त्याच्या व्युहरचनेत निर्णायक महत्व असते. त्याप्रमाणे तुम्ही वागलाच नाहीत, तर त्याचे सगळे डावपेच निरूपयोगी ठरून जातात. कधीकधी शत्रूच त्याच्या व्यूहरचनेचा बळी होत असतो. काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता गमावण्याचे तेच कारण आहे. तिथे भाजपच्या रणनीतीकारांना अपेक्षित असा प्रतिसाद विरोधकांकडून आलाच नाही. ज्याप्रकारे पश्चिम बंगलमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता या भाजप विरोधातली आघाडी उघडून मैदानात उतरल्या आहेत, तसा उतावळेपणा ओडीशाच्या नवीनबाबूंनी केला नाही. तिथे भाजप त्यांची सत्ता हिसकावून घेऊ शकला नाही. पण मागील लोकसभा निवडमुकीत बंगालमध्ये ममताला शह देऊन १८ जागा जिंकण्यापर्यंत भाजपने मजल मारली.

त्याचे श्रेय भाजपच्या डावपेचांपेक्षाही ममतांच्या उतावळ्या प्रतिसादाला दिले पाहिजे. कारण त्यांच्या आक्रस्ताळेपणाने तृणमूलचा नसलेला वा काँग्रेस व डाव्यांचा मतदार भाजपकडे एकत्रित व्हायला बहुमोलाचा हातभार लागला होता. मात्र त्यापासून ममता कुठलाही धडा शिकायला राजी नाहीत. आताही त्यांना भांडण्याची मोठी खुमखुमी आहे आणि त्यांनी तशीच आवेशपूर्ण भाषेत व आवाजात शिवीगाळ करावी; हीच भाजपची खरी रणनीती आहे. कारण त्यातून विखुरलेला तृणमूल विरोधी मतदार भाजपकडे आपोआप येत असतो. त्यालाच राजकीय विश्लेषणात मतांचे ध्रुवीकरण म्हणतात.

- Advertisement -

नव्याने मुलूखगिरी करणार्‍या पक्षाला आपल्या बाजूला नसलेली मते आपल्याकडे खेचून, यशाच्या दिशेने आगेकूच करावी लागत असते. त्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळावे लागत असतात. जिथे आपला मतदार कमी असतो, तिथे अन्य पक्षांचा मतदार त्या पक्षाला कंटाळून आपल्याकडे येईल; अशी एक रणनीती असते. त्यालाच जोडून प्रमुख पक्षाच्या विरोधातली मते आपल्याभोवती गोळा होतील, यालाही प्राधान्य द्यावे लागत असते. त्यासाठी विरोधातल्या पक्षांची एकजूट होण्याला प्रोत्साहन देण्यानेही मोठे काम होत असते. भाजपचा अनेक राज्यातील वाढविस्तार अशाच डावपेचातून झालेला दिसेल. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ डाव्या आघाडीने काँग्रेसला संपवून आपले बस्तान बसवलेले होते. त्यांना कोणी आव्हानच देऊ शकत नाही, अशी एक राजकीय समजूत तयार झालेली होती.

त्या काळात ममता काँग्रेसमध्येच होत्या आणि डाव्यांना बंगालमधून संपवण्यासाठी त्या आग्रही होत्या. पक्ष नेतत्वाकडून त्यांना प्रतिसाद मिळेना, तेव्हा ममता बाहेर पडल्या व त्यांनी तृणमूल नावाची नवी प्रादेशिक काँग्रेस स्थापन केली. त्यांच्यासारखा विचार करणारे अनेक कार्यकर्ते नेते त्यांच्या पाठीशी जमा झाले. त्यानंतर कधी भाजपला सोबत घेऊन, तर कधी काँग्रेसशी युती करून; ममता डाव्यांशी दोन हात करीत राहिल्या. प्रथम त्यांनी दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि ज्योती बसूंच्या नंतर डाव्यांचे नेतृत्व करणारे भट्टाचार्य मुख्यमंत्री झाल्यावर ममता अधिक आक्रमक झाल्या. त्यांना मुसंडी मारण्यासाठी एक संधी हवी होती आणि ती डाव्यांच्या गुंडगिरीने मिळून गेली. सिंगूर व नंदीग्राम या दोन गावातील जमीन सक्तीने अधिगृहीत करण्याच्या विरोधात तिथले गावकरी उभे ठाकले आणि ममतांनी तिथे जाऊन मुक्कामच ठोकला. बंगालच्या राजकारणाने तिथेच मोठे वळण घेतले.

- Advertisement -

तीन दशकानंतर कोणी खरोखरच डाव्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने माध्यमांचाही ममतांना पाठिंबा मिळाला आणि त्यांचे सिंगूरचे उपोषण देशव्यापी बातमी झाली. डाव्यांची बंगालमधली गुंडगिरी चव्हाट्यावर आली. पण विषय तिथेच संपत नव्हता. डाव्यांना कंटाळलेला बराच मतदार होता आणि तो अन्य पक्षात वा काँग्रेस पक्षाकडे विखुरलेला होता. तो हळुहळू ममतांच्या पाठीशी एकवटत गेला. ममतांना रोखण्याचे वा दडपून टाकायचे जितके प्रयास डाव्यांनी केले, तितकी ममतांची मते वाढतच गेली. गाव तालुक्यात डाव्या गुंडांना वैतागून गेलेला समाज ममतांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि बघता बघता डाव्यांची सद्दी संपली.

एकदा सत्ता ममतांच्या हातात गेल्यावर डाव्यांच्या गुंडांना पोलिसांचेही पाठबळ उरले नाही. मग तशा गुंडांनी आपापली संस्थाने कायम राखण्यासाठी आपोआप ममतांच्या पक्षाचा आश्रय घेतला. थोडक्यात डाव्यांनी गुंडगिरी करून बंगालला आपला अभेद्य किल्ला बनवलेला होता, तिथे ममतांची सत्ता प्रस्थापित झाली. दुसर्‍या पक्षांना निवडणुका लढवणेही अशक्य होऊन गेले. मात्र त्या गुंडगिरीशी टक्कर द्यायची हिंमत डाव्यांचे नवे नेतृत्व हरवून बसलेले होते. काँग्रेस तर कुठल्याही संघर्षाला अनुत्सुकच होती. मोदींच्या उदयानंतर भाजपने तिथे लक्ष पुरवले आणि बंगाल आपला नवा गड म्हणून काबीज करण्याची रणनीती अवलंबली. ममतांचा आक्रस्ताळेपणा व त्यांच्या पक्षाच्या गुंडगिरीला तोंड देणारा एकमेव पक्ष, अशी आपली प्रतिमा मागल्या पाच वर्षात भाजपने उभी केली आणि त्याचा लाभ त्या पक्षाला गेल्या लोकसभेत मिळाला. ज्याला २०१६ मध्ये विधानसभेत डझनभर आमदार निवडून आणता आले नव्हते; त्या भाजपने २०१९ मध्ये लोकसभेत तब्बल १८ खासदार निवडून आणले. डाव्यांचा तर सफायाच झाला आणि ममता बॅनर्जींनाही दणका बसला. त्यासाठी भाजपाने योजलेल्या रणनीतीला ममतांनी दिलेला प्रतिसाद निर्णायक ठरला.

एकतर सत्तेत आल्यापासून ममतांनी आपले सगळे लक्ष पुरोगामी भूमिकेतून मुस्लिमांच्या लांगुलचालनावर केंद्रित केले. दुसरीकडे आपल्या पक्षांच्या गुंडांकरवी भाजपला मारून संपवण्याचा खेळ आरंभला. परिणामी बंगालमध्ये हिंदू भाजपकडे एकवटत गेला आणि गुंडगिरीने गांजलेला मतदारही भाजपाच्या गोटात जमा होत गेला. सर्वात कहर म्हणजे भाजपच्या हिंदुत्वाला शह देण्यासाठी ममतांनी हिंदू सण समारंभांनाही प्रतिबंध घालण्यापर्यंत मजल मारली. दुर्गापूजा हा तिथला सर्वात मोठा सार्वजनिक हिंदू उत्सव; त्यालाही चाप लावण्याचे ममतांचे सरकारी फतवे कोर्टात टिकले नाहीतच. पण त्यांना कोर्टात आव्हान देणारा भाजप हिंदू मतदारांसाठी ‘आपला पक्ष’ होण्याला हातभार लागला.

बंगालची दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे शेजारी बांगला देशातून आलेले निर्वासित ही आहे. त्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचा भरणा असून त्यांच्या वाढत्या लोकसंख्येने अनेक सीमावर्ती जिल्ह्यात मतदारसंख्याही बदलून गेली आहे. त्यामुळे तिथला मुस्लीम मतदार खिशात टाकण्यासाठी ममतांनी मुस्लिमधार्जिणे धोरण घेतले आणि आपोआप हिंदू वा बिगर मुस्लीम मतांचा ओढा भाजपकडे होत गेला. कारण काँग्रेस वा डाव्या पक्षांमध्ये हिंदूची उघड बाजू घेण्याची हिंमत नाही आणि मुस्लिमांच्या घुसखोरीवर बोलणे त्यांना शक्य नव्हते. त्याचाच लाभ उठवित भाजप अवघ्या पाच वर्षात बंगालमध्ये हातपाय पसरत गेला. आता त्याने ममतांचेच जुने हत्यार उपसलेले आहे. २००९ नंतर ममता सातत्याने संसदेत बांगला घुसखोरांना हाकलण्याची मागणी करीत होत्या. आता तशीच नव्हेतर तीच मागणी भाजप सरकारने कायदा रुपाने संमत केली असताना मात्र ममता उलटी भाषा बोलत आहेत. त्यामुळे त्यांचे बदलते मतांचे राजकारण उघडे पडले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करून ममतांनी त्यांचा आरंभीचा मतदारच भाजपला देऊन टाकला आहे.

बांगलादेशी घुसखोर वा निर्वासित यांच्यामुळे बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यामध्ये एकूण मतदारसंघाचे चरित्र बदलून गेले आहे. त्यातले अनेक मतदारसंघ क्रमाक्रमाने मुस्लीम बहूल होऊन गेले आहेत. त्यांच्या उचापतींनी बंगालच्या शांततेला तडा गेलेला आहे. पण मुस्लीम मतांवरच राजकारण करणार्‍या बहुतांश पुरोगामी पक्षांमध्ये त्या विरोधात चकार शब्द उच्चारण्याची हिंमत नाही. परिणामी ती भाजपची मक्तेदारी होऊन बसली आहे. थोडक्यात ममतांनी असा आक्रस्ताळेपणा करून हिंदूंना दुखवावे, हीच तर भाजपची रणनीती आहे. ममता त्याला अपेक्षित प्रतिसाद देतात. पर्यायाने भाजपला मदत करीत असतात. त्यांच्या असल्या जाहिराती वा अलिकडल्या मुस्लीमबहुल परिसरातील दंगली हिंसाचारानंतर किती मुस्लीम मते ममतांना वाढवून मिळतील, हे ठाऊक नाही. पण त्यांच्या अशा वागण्याने नाराज हिंदू मोठ्या संख्येने भाजपकडे वळला आहे. तो ममतांना या निवडणुकीत धूळ चारणार हे निश्चित.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -