घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमाझ्या कारकिर्दीचे श्रेय कर्मचाऱ्यांनाच

माझ्या कारकिर्दीचे श्रेय कर्मचाऱ्यांनाच

Subscribe

काल दुपारी बांद्रा येथील म्हाडाच्या मुख्य कार्यालयामधील कर्मचारी व अधिका-यांची भेट घेतली. म्हाडाचे काम गतीमान व्हावे यासाठी मागील अडीच वर्षांमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. आपल्याला आश्चर्य वाटेल कि, मागच्या अडीच वर्षामध्ये म्हाडाच्या दर आठवड्याला आढावा बैठक होत असतं. एकूण बैठकींची संख्या ही जवळ-जवळ अडीचशेच्या पार झाली. या दरम्यान अनेक नवीन योजना आणल्या. 10 वर्षांत जेवढा अर्थसंचय झाला नव्हता त्याहून अधिक अर्थसंचय मागच्या दोन वर्षांत झाला. 10 वर्षांत जेवढी देकारपत्र देण्यात आली नव्हती ती मागच्या दोन वर्षांत देता आली. म्हाडाचा पुनर्विकास गतीमान झाला.

त्यातूनच म्हा़डा केवळ घरबांधणीच्या क्षेत्रात नसून त्याची काही सामाजिक जबाबदारी आहे, याची देखील मी महाराष्ट्राला जाणीव करुन दिली. कोकणात तळीये गावामध्ये मागील वर्षी दरड कोसळून उडालेला हाहाकार, आणि म्हाडाने घेतलेला निर्णय कि, तळीये गावाचा विकास आम्ही करणार. हे म्हाडाचे सामाजिक भान दर्शवित होते. त्याचबरोबर कॅन्सर रुग्णांच्या नातेवांईकांसाठी 100 खोल्या उपलब्ध करुन देणे, त्याही दादरमध्ये. मुला-मुलींचे वसतिगृह, काम करणा-या महिलांसाठी वसतिगृह. तीन वेगवेगळ्या ठिकाणी Old age Home, बांद्रा येथे मुक्या प्राण्यांसाठी मोक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल, गोरेगाव येथे जवळ-जवळ अडीच एकर जागेवरती हॉस्पिटलच्या बांधणीला सुरुवात. त्याचबरोबर त्या हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या भूखंडावर हॉस्पिटलशी संलग्न असे वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृह. यापुढे कोणाला मुंबईमधील Play Ground किंवा Recreational Ground द्यायचे नाही ते म्हाडाने स्वत: ठेवावे, विकसीत करावे व लोकोपयोगात आणावे हा निर्णय. म्हाडाच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या शोधून काढून म्हाडातर्फे संरक्षक भिंती बांधून कब्जात ठेवणे. अश्या अनेक घोषणा झाल्या.

- Advertisement -

बीडीडी चाळ जी 30 वर्षे बंद होती त्याच्या कामाला सुरुवात झाली. पत्राचाळीच्या कामाला सुरुवात झाली. पहाडी गोरेगावचे काम बरेच पुढे गेले आहे. तिथे पत्रकारांना व चित्रपट सृष्टीमध्ये पडद्याच्या मागे काम करणा-यांना घरे द्यावीत ही माझी मनिषा होती. ते काम मी फक्त बोलून गेलो पण ते काम काही मी पूर्ण करु शकलो नाही. येणारे मंत्री ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. शीळ फाट्याजवळ असलेल्या आडवली गावातील 200 एकर जमिनीवर मोठे गृहनिर्माण संकुल तयार करावे यासाठी घेतलेला निर्णय. अशा अनेक योजना मी कार्यान्वित करु शकलो. त्या केवळ अधिका-यांच्या आणि कर्मचा-यांच्या योगदानामुळे त्यांच्या सहकार्यामुळेच. त्यामुळे माझ्या मनाला तरी स्पष्टता आहे, कि माझी कारकिर्द मी यशस्वी करु शकलो. किती काळ मिळाला यापेक्षा मी निर्णय किती घेतले, कसे घेतले आणि त्याचे समाजावर काय परिणाम होणार आहेत हे महत्वाचे आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये घरांमध्ये घोटाळा झाला आहे हे लक्षात येताच तेथे चौकशी लावली. फक्त 157 घरे म्हाडाने महानगरपालिकेकडून घेतली होती. परंतु चौकशी अंती आज जवळ-जवळ 5000 घरे म्हाडाला नाशिकमध्ये मिळणार आहेत. तसेच पुण्यामध्ये हजारोने घरे आम्ही नागरिकांना देऊ शकलो. औरंगाबादमध्ये 4000 च्या वरती घरे आम्ही नागरिकांना देऊ शकलो. ह्या सगळ्यामध्ये त्या-त्या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी काम करत होते. हे त्यांचे यश आहे. माझा फक्त हातभार लागला आहे. त्यामुळे मनात किंचीतही सत्ता गेल्याचे दु:ख नसून जेव्हा सत्ता होती तेव्हा लोकोपयोगासाठी ती वापरली याचा आनंद आहे.

तुमच्यामुळेच माझा काळ स्मरणात राहील ही भावना व्यक्त करण्यासाठी काल म्हाडामधील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची भेट घेतली व त्यांचे आभार मानले.

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -